
टीम इंडियाने रविवारी 1 मार्च रोजी वेस्ट इंडिजवर आर या पार सामन्यात विजय मिळवला. टीम इंडियाने या विजयासह सुपर 8 मोहिमेचा विजयाने शेवट करत सेमी फायनलमध्ये प्रवेश केला. टीम इंडियाने संजू सॅमसन याच्या नाबाद खेळीच्या जोरावर वर्ल्ड कप स्पर्धेत विक्रमी धावांचा यशस्वी पाठलाग करुन दाखवला. विंडीजने 196 धावांचं आव्हान ठेवलं होतं. भारताने हे आव्हान 5 विकेट्स गमावून 19.2 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. संजू सॅमसन याने नाबाद 97 धावा केल्या. संजूने चाबूक खेळी करत भारताला उपांत्य फेरीचं तिकीट मिळवून दिलं.
संजूला कोलकातमधील इडन गार्डन्समध्ये केलेल्या या खेळीमुळे सामनावीर पुरस्कारने सन्मानित करण्यात आलं. आता टीम इंडिया सेमी फायनलमध्ये इंग्लंड विरुद्ध भिडणार आहे. त्या सामन्याआधी टीम इंडियाचा हेड कोच गौतम गंभीर याने इंग्लंडला इशारा दिला आहे. गंभीर काय म्हणाला हे जाणून घेऊयात. आम्ही पुढील सामना जिंकू. तसेच प्रत्येक आघाडीवर आम्हाला चांगली कामगिरी करावी लागेल, असं गंभीर म्हणाला.
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील सेमी फायनलचा सामना हा गुरुवारी 5 मार्चला खेळवण्यात येणार आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये होणार आहे.
“इंग्लंड एक दर्जेदार टीम आहे. तसेच वानखेडे अवघड स्टेडियम आहे. आम्ही चांगलं क्रिकेट खेळू. तसेच इंग्लंड सारख्या टीम विरुद्ध विजय मिळवण्यासाठी आवश्यक सर्व ते करु”, असं म्हणत गंभीरने विश्वास व्यक्त केला.
दरम्यान टीम इंडिया वेस्ट इंडिजवर मात करुन आयसीसी टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात उपांत्य फेरीत इंग्लंड विरुद्ध सलग आणि एकूण तिसऱ्यांदा भिडणार आहे. याआधी दोन्ही संघ 2022 आणि 2024 साली झालेल्या टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेतील सेमी फायनलमध्ये आमनेसामने आले होते. इंग्लंडने भारताला 2022 साली पराभूत करत अंतिम फेरीत धडक दिली होती. तर भारताने 2024 मध्ये विजय मिळवून 2022 च्या पराभवाची परतफेड केली होती. त्यामुळे आता तिसऱ्यांदा दोघांपैकी कोणता संघ मैदान मारतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान त्याआधी 4 मार्चला उपांत्य फेरीतील पहिल्या सामन्याचा थरार रंगणार आहे. या सामन्यात गतउपविजेता दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड आमनेसामने असणार आहेत. हा सामना कोलकातामधील इडन गार्डन्समध्ये होणार आहे.