
पाकिस्तानचा क्रिकेट संघ आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत टीम इंडिया विरुद्ध होणाऱ्या सामन्यात खेळणार नसल्याचं सरकारने जाहीर केलं. पाकिस्तान सरकारने 1 फेब्रुवारीला टीम इंडिया विरुद्ध 15 फेब्रुवारीला नियोजित सामन्यावर बहिष्कार घातल्याचं जाहीर केलं. मात्र पाकिस्तानकडून या सामन्यावर बहिष्कार घालण्याचं कारण स्पष्ट करण्यात आलं नाही. पाकिस्तानच्या या निर्णयामुळे क्रिकेट चाहत्यांना हायव्होल्टेज सामन्याला मुकावं लागणार आहे. तसेच हा सामना होणार नसल्याने आयसीसी आणि पीसीबीला आर्थिक नुकसान सहन करावं लागणार आहे. पाकिस्तानवर या अशा निर्णयामुळे क्रिकेट विश्वातून जोरदार टीका केली गेली. मात्र पाकिस्तान भविष्यातील संबंध आणि आर्थिक तोटा पाहता हा निर्णय मागे घेणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशात आता याबाबतीत एक मोठी अपडेट समोर आली आहे. पाकिस्तानने टीम इंडिया विरूद्धच्या सामन्यात खेळण्यासाठी 1 अट ठेवल्याचं समजत आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
पाकिस्तानी मीडिया रिपोर्ट्सनुसार, बांगलादेशचा या टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत समावेश केला तरच पाकिस्तान भारत विरूद्धच्या सामन्यात खेळेल. टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामना हा कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे. तसेच बांगलादेशने सुरक्षेचं कारण पुढे करत या स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला आहे.
बीसीसीआयच्या आदेशानंतर आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्स या फ्रँचायजीने आपल्या संघातून बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहमान याची हकालपट्टी केली. त्यानंतर बांगलादेश क्रिकेट बोर्डाला अचानक त्यांचे खेळाडू भारतात सुरक्षित नसल्याचं जाणवलं. त्यामुळे बांगलादेशने आयसीसीकडे त्यांचे वर्ल्ड कप स्पर्धेतील सामने हे श्रीलंकेत खेळवण्यात यावे, अशी विनंती केली. मात्र आयसीसीने ही विनंती फेटाळून लावली. तसेच इथेच भारतात सामने खेळावे लागतील, असंही ठणकावून सांगितलं. त्यानंतर बांगलादेशने या स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आयसीसीने या स्पर्धेत बांगलादेशच्या जागी स्काॅटलँडचा समावेश केला.
पाकिस्तान आधीच आर्थिकरित्या खड्ड्यात आहे. आयसीसी स्पर्धेतील सहभागी संघांना आर्थिक फायदा होतो. आयसीसीकडून संबंधित क्रिकेट संघाला वर्ल्ड कप स्पर्धेतील प्रत्येक सामन्यासाठी मानधन म्हणून ठराविक रक्कम दिली जाते. तसेच सामना जिंकल्यास मिळणारी रक्कम ही वेगळी असते. स्पॉन्सरशीप, ब्रॉडकास्टिंग राइट्स, स्पॉन्सरशीप, या आणि अशा विविध माध्यमातून प्रत्येक क्रिकेट संघाची कमाई होते. तसेच भारत-पाकिस्तान सामन्यातून होणारी कमाईचा आकडा हा काही हजार कोटींच्या घरात असतो. त्यामुळे पाकिस्तान टीम इंडिया विरूद्धच्या सामन्यात न खेळण्याच्या निर्णयावर कायम राहून पायावर कुऱ्हाड मारणार की आयसीसीसोबतचे भविष्यातील संबंध पाहून निर्णय मागे घेणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.