INDA vs PAKA : भारताचा शानदार विजय, पाकिस्तानचा बँकॉकमध्ये 8 विकेट्सने धुव्वा, 59 बॉलआधीच संपवला सामना

India A Women vs Pakistan A Women Match Result : भारतीय महिला संघ यूएई विरुद्ध अपयशी ठरली. मात्र भारताने पाकिस्तानला पराभूत करत विजयाचं खातं उघडलं. भारताने पाकिस्तानवर एकतर्फी विजय मिळवला.

INDA vs PAKA : भारताचा शानदार विजय, पाकिस्तानचा बँकॉकमध्ये 8 विकेट्सने धुव्वा, 59 बॉलआधीच संपवला सामना
India Flag
| Updated on: Feb 15, 2026 | 4:02 PM

वूमन्स एमर्जिंग आशिया कप 2026 स्पर्धेत इंडिया ए टीमची सुरुवात पराभवाने झाली. भारताला राधा यादव हीच्या नेतृत्वात आपल्या मोहिमेतील पहिल्याच सामन्यात उलटफेरचं शिकार व्हावं लागलं. यूएईने भारतावर 13 फेब्रुवारीला 7 विकेट्सने मात केली होती. त्यामुळे भारतासाठी दुसरा सामना हा स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी करो या मरो असा झाला होता. मात्र भारताने अटीतटीच्या सामन्यात कमाल केली. भारताच्या अ संघाने कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तान ए टीमचा धुव्वा उडवत विजयाचं खातं उघडलं आहे.

बँकॉकमधील टेर्डथाई क्रिकेट ग्राउंडमध्ये या स्टेडियममध्ये या बहुप्रतिक्षित सामन्याचं आयोजन करण्यात आलं होतं. पाकिस्तानने या सामन्यात भारतासमोर 94 धावांचं माफक आव्हान ठेवलं होतं. भारताने हे आव्हान 59 बॉलआधी सहज पूर्ण केलं आणि पहिल्या विजयाची नोंद केली. वृंदा दिनेश ही भारताच्या विजयाची शिल्पकार ठरली. तसेच अनुष्का शर्मा आणि तेजल हसबनीस या दोघींनीही बॅटिंगने विजयात योगदान दिलं.

सामन्यात काय झालं?

पाकिस्तान टीमने टॉस जिंकून मोठ्या विश्वासाने बॅटिंगचा निर्णय घेतला. मात्र पाकिस्तानला भारतीय गोलंदाजांसमोर 20 ओव्हर खेळता आलं नाही. भारताने पाकिस्तानला 18.5 ओव्हरमध्ये 93 रन्सवर ऑलआऊट केल. पाकिस्तानसाठी शव्वाल झुल्फिकार हीने सर्वाधिक 23 धावा केल्या. तर गुल रुख हीने 21 धावांचं योगदान दिलं. अनोश नासिर हीने अखेरच्या क्षणी 17 धावांचं निर्णायक योगदान दिलं. भारताकडून राधा यादव, प्रेमा रावत आणि सायमा ठाकोर या त्रिकुटाने प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तर दोघींनी प्रत्येकी 1-1 विकेट्स मिळवल्या.

भारताचा दणदणीत विजय, पाकिस्तानचा 8 विकेट्सने धुव्वा

पाकिस्तानने 94 धावांचा पाठलाग करायला आलेल्या भारतीय संघाला पहिल्याच बॉलवर झटका दिला. हुमैरा काझी गोल्डन डक होऊन मैदानाबाहेर गेली. त्यानंतर वृंदा दिनेश आणि अनुष्का शर्मा या जोडीने भारताच्या विजयाचा पाया रचला. या दोघींनी दुसऱ्या विकेटसाठी 50 बॉलमध्ये 79 रन्सची पार्टनरशीप केली. अनुष्का शर्मा हीच्या रुपात भारताने दुसरी विकेट गमावली. अनुष्काने 24 धावा केल्या.

त्यानंतर वृंदाने तेजल हसबनीससह उर्वरित धावा जोडल्या आणि भारताला विजयी केलं. भारताने 10.1 ओव्हरमध्ये 97 रन्स केल्या. वृंदाने 29 बॉलमध्ये 12 चौकारांसह नाबाद 55 रन्स केल्या. तर तेजलने नाबाद 12 धावा केल्या. वृंदाला तिने केलेल्या नाबाद अर्धशतकासाठी मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आलं.