IND vs AFG: कसोटीसाठी शुबमन गिलच्या नेतृत्वात संघाची घोषणा, पंतकडून जबाबदारी काढली
आयपीएल 2026 स्पर्धा आता शेवटच्या टप्प्यात असताना बीसीसीआय पुढच्या तयारीला लागली आहे. जून महिन्यात टीम इंडिया आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरूवात करणार आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात मालिका होणार आहे. यासाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे.

आयपीएल स्पर्धा संपल्यानंतर टीम इंडिया लगेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यास सज्ज होणार आहे. 6 जूनपासून अफगाणिस्तानविरुद्ध मालिकेला सुरूवात होणार आहे. यात एक कसोटी आणि तीन वनडे सामन्यांची मालिका होणार आहे. कसोटी मालिकेसाठी शुबमन गिलच्या नेतृत्वात 15 सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात एकमेव कसोटी सामना होणार आहे. हा सामना 6 जूनपासून असेल. या सामन्याच्या निकालाचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेवर काही परिणाम होणार नाही. कारण अफगाणिस्तान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा भाग नाही. दरम्यान कसोटी संघाची घोषणा करताना विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतकडून मोठी जबाबदारी काढून घेण्यात आली आहे. ऋषभ पंतला उपकर्णधारपदावरून काढण्यात आलं आहे. आता ही जबाबदारी केएल राहुलच्या खांद्यावर असणार आहे. इतकंच काय तर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला या मालिकेसाठी आराम दिला गेला आहे. दुसरीकडे, फिरकीपटू रवींद्र जडेजा यालाही डावलण्यात आलं आहे.
गुवाहाटीत टीम इंडियाच्या निवड समितीत एक बैठक पार पडली. या बैठकीनंतर मुख्य निवडकर्ते अजीत आगरकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी कसोटी संघात उपकर्णधाराची जबाबदारी केएल राहुलच्या खांद्यावर असेल असं जाहीर केलं. त्यामुळे क्रीडाप्रेमींना आश्चर्याचा धक्का बसला. कारण मागच्या वर्षीच त्याच्या खांद्यावर उपकर्णधारपदाची जबाबदारी दिली होती. पण आयपीएल स्पर्धेत त्याच्या नेतृत्वात आणि त्याच्या फलंदाजीवर झालेला परिणाम पाहता त्याच्याकडून जबाबदारी काढून घेतल्याचं बोललं जात आहे. तसेच अनुभवी ओपनर केएल राहुलला ही जबाबदारी सोपवली आहे.
🚨 News 🚨
Presenting #TeamIndia‘s squads for the @IDFCFIRSTBank Test match and the 3️⃣-match ODI series against Afghanistan in June 🙌#INDvAFG pic.twitter.com/hFiABALLld
— BCCI (@BCCI) May 19, 2026
ऋषभ पंत सुमार कामगिरीमुळे टी20 नंतर वनडे संघातून बाहेर गेला आहे. त्याच्या जागी वनडे संघात फॉर्मात असलेल्या इशान किशनला संधी मिळाली आहे. इशान किशनची अडीच वर्षानंतर वनडे संघात पुनरागमन झालं आहे. ऋषभ पंत कसोटी संघात अजूनही अव्वल यष्टीरक्षक आहे, तर ध्रुव जुरेल त्याचा राखीव खेळाडू असणार आहे. तर इशानला त्याच्या कसोटी पुनरागमनासाठी अजून काही काळ प्रतीक्षा करावी लागेल.
भारताचा कसोटी संघ : शुबमन गिल (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल (उपकर्णधार), साई सुदर्शन, ऋषभ पंत, देवदत्त पडिक्कल, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, मानव सुथार, गुरनूर ब्रार, हर्ष दुबे, ध्रुव जुरेल.