IND vs BAN : दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होण्याची शक्यता, काय ते जाणून घ्या

भारत आणि बांग्लादेश यांच्यात दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना 27 सप्टेंबरपासून कानपूर येथे होणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ सज्ज झाले आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने हा सामना भारतासाठी महत्त्वाचा आहे. यावेळी प्लेइंग 11 मध्ये बदल होऊ शकतो.

IND vs BAN : दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होण्याची शक्यता, काय ते जाणून घ्या
| Updated on: Sep 26, 2024 | 2:58 PM

भारत आणि बांग्लादेश यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना जिंकून भारताने 1-0 ने आघाडी घेतली आहे. तर दुसरा कसोटी सामना कानपूरला होणार असून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने हा सामना महत्त्वाचा आहे. दुसरा कसोटी सामना 27 सप्टेंबरपासून कानपूरच्या ग्रीन पार्क मैदानात होणार आहे. कानपूरची खेळपट्टी ही काळ्या मातीची असून फिरकीपटूंना मदत करणारी आहे. त्यामुळे दुसऱ्या सामन्यासाठी टीम इंडियाच्या प्लेइंग 11 मध्ये बदल होऊ शकतो. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज किंवा आकाश दीपला या सामन्यात आराम दिला जाण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त संघात काही बदल होईल असं वाटत नाही. यशस्वी जयस्वाल आणि रोहित शर्मा सलामीवीर म्हणून फलंदाजीला येतील. शुबमन गिल तिसऱ्या स्थानावर फलंदाजी करेल. चौथ्या स्थानासाठी विराट कोहलीचं नाव पक्कं आहे. तर पाचव्या स्थानावर विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत येईल.

केएल राहुल सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येईल. तर अष्टपैलू खेळाडूच्या भूमिकेत असलेला रवींद्र जडेजा सातव्या आणि आर अश्विन आठव्या क्रमांकावर खेळण्यासाठी येतील. तर नवव्या स्थानासाठी कुलदीप यादवचा विचार केला जाईल. मोहम्मद सिराज किंवा आकाश दीप ऐवजी संघात फिरकीपटू कुलदीप यादवला संधी मिळू शकते. शक्यतो मोहम्मद सिराजला आराम दिला जाण्याची शक्यता आहे. पहिल्या सामन्यात त्याची कामगिरी काही खास नव्हती. कुलदीप यादव पहिल्या सामन्यात प्लेइंग 11 चा भाग नव्हता. पण कानपूरची खेळपट्टी फिरकीपटूंना मदत करणारी असल्याने हा बदल होण्याची शक्यता आहे. तसेच जसप्रीत बुमराह मुख्य वेगवान गोलंदाज म्हणून ताफ्यात असणार आहे.

बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी अशी असू शकते प्लेइंग 11 : यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा,,शुबमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत, केएल राहुल, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, आकाश दीप,जसप्रीत बुमराह.

दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने विजय मिळवला तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील अव्वल स्थान आणखी पक्कं होईल. टीम इंडियाला या कसोटी मालिकेनंतर न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे.

Follow Us