ते घर बसल्याच पाठिंबा देतात… मातोश्रीत बसून…; आता अंजली दमानियांचाही ठाकरेंना टोला
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सोनम वांगचुक यांना रुग्णालयात दाखल करण्याच्या कारवाईवर केंद्र सरकारला लक्ष्य केले. सरकार निर्दयी असल्याचे सांगत, त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाही टोला लगावला. ठाकरे केवळ मातोश्रीतून पाठिंबा देतात, प्रत्यक्ष आंदोलनात सहभागी होत नाहीत, अशी टीका दमानिया यांनी केली.

अखेर सोनम वांगचुक यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांचं उपोषण मोडीत काढण्यात आलं आहे. त्यामुळे विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. विरोधकांनी केंद्र सरकारवर चांगलंच तोंडसुख घेतलं आहे. यापूर्वी विरोधकांनी दिल्लीच्या जंतरमंतरवर जाऊन वांगचुक यांना पाठिंबा दिला होता. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सरकारच्या या कारवाईवर चांगलीच टीका केली आहे. ही टीका करतानाच त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही जोरदार हल्ला चढवला आहे.
उद्धव ठाकरेंसारखा पाठिंबा नको, ते घर बसल्या पाठिंबा देत असतात. नुसतंच मीडियाशी बोलतात. वांगचुक यांची विचारपूस करण्यासाठी अदित्य जाऊ शकला असता. पण ते गेले नाहीत. इंडिया आघाडीच्या बैठकीला दिल्लीत जायला वेळ आहे. पण आंदोलनात जायला वेळ नाही. मातोश्रीत घरात बसून राजकारण होत नाही, असा टोलाच अंजली दमानिया यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. त्या मीडियाशी संवाद साधत होत्या.
निर्दयी माणसांचं सरकार
सोनम वांगचुक हे उत्कृष्ट शास्त्रज्ञ आहेत. त्यांनी आर्टिफिशियल ग्लेशियर वाढवले. नीटचा मुद्दा घेऊन ते उपोषणाला बसले. याची केंद्र सरकारने गंभीर दखल घ्यायला हवी होती. पहिल्याच दिवशी त्यांच्याशी चर्चा करायला पाहिजे होती. पण तसं काही झालं नाही. सरकार निर्दयी, दिशाहीन, असंवेदनशील आहे. सज्जन माणसांचं हे सरकार नाही, हृदय नसलेलं हे सरकार, असा हल्लाबोलच दमानिया यांनी केला.
दीपकेंना फरफटत नेलं
कोर्टात पीआयएल केलं आहे. आज इंटरव्हेन केलं आहे. वागंचुक यांचं उपोषण मोडीत काढल्यानंतर त्याला अभिजीत दीपकेंनी विरोध केला. त्यांनाही पोलिसांनी फरफटत नेलं. त्यांना पोलिसांनी मारलं. या सरकारला काहीच पडलं नाहीये, असं त्या म्हणाल्या. वांगचुक यांच्या रिपोर्ट्समध्ये त्यांची प्रकृती खालवल्याचं दिसतंय, अशी माहितीही त्यांनी दिली.
मोर्चा झालाच पाहिजे
संसदेचं अधिवेशन येत्या 20 तारखेपासून सुरू होणार आहे. नीटमुळे 21 मुलांचे आयुष्य संपलं आहे. या सरकारने त्यांचा इगो महत्त्वाचा, अस्तित्व महत्त्वाचं नाही हेच दाखवून दिलं आहे. त्यामुळे येत्या 20 तारखेला मोर्चा झालाच पाहिजे, असंही त्या म्हणाल्या. वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली यांना डॉक्टर कोणताही माहिती देत नाही. ड्रीप लावायचे नाही हे त्यांनी सांगितलं आहे. पण तसं होऊ दिलं जात नाहीये. वांगचुक यांच्यावर देखरेख करणं त्यांचं काम होतं. पण त्यांना कुणालाच भेटू दिलं जात नाहीये, असा दावा त्यांनी केला.
शिंदे, एनसीपीशी बोलायला वेळ, पण…
यावेळी त्यांनी राज्य सरकारवरही टीका केली. सरकारला एनसीपीचे नेते आणि एकनाथ शिंदेंशी बोलायला वेळ आहे. पण वांगचूक यांना भेटायला वेळ नाही. या देशात जबाबदारी घ्यायला हवी, असं मत त्यांनी व्यक्त केलं.
