T20 WC 2026 : राखीव दिवशीही खेळ न झाल्यास फायनलमध्ये कोण? भारताला मोठा झटका!

Icc T20i World Cup 2026 Semi Final Reserve Day Rule : टीम इंडिया सेमी फायनलमध्ये पोहचली आहे. मात्र त्यानंतरही जर तरचं गणित कायम आहे. समजा उपांत्य फेरीतील सामन्याचा राखीव दिवशीही निकाल लागला नाही तर विजेता कसा ठरणार? जाणून घ्या.

T20 WC 2026 : राखीव दिवशीही खेळ न झाल्यास फायनलमध्ये कोण? भारताला मोठा झटका!
Suryakumar Yadav Indian Cricket Team
Image Credit source: PTI
| Updated on: Mar 02, 2026 | 7:22 PM

अखेर अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर आणि थरारानंतर आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेसाठी उपांत्य फेरीतील 4 संघ निश्चित झाले आहेत. वेगवेगळ्या 4 खंडांतून 4 संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले आहेत. स्पर्धेतील चौथा आणि शेवटचा उपांत्य फेरीतील संघ सुपर 8 फेरीतील अखेरच्या सामन्यानंतर निश्चित झाला. यजमान भारत उपांत्य फेरीत पोहचणारा चौथा संघ ठरला. त्यामुळे फायनलमध्ये पोहचण्यासाठी कोणता संघ कुणाविरुद्ध उपांत्य फेरीत खेळणार? हे स्पष्ट झालं आहे.

उपांत्य फेरीतील पहिला सामना हा कोलकातामधील इ़डन गार्डन्समध्ये होणार आहे. तर दुसरा सामना हा मुंबईतील वानखेडे स्टेडियमध्ये होणार आहे. दुसऱ्या सामन्यात टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड आमनेसामने असणार आहेत. तर पहिल्या सामन्यात फायनलमध्ये पोहचण्यासाठी न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात चढाओढ पाहायला मिळणार आहे. उपांत्य फेरीतील दोन्ही सामने हे अनुक्रमे 4 आणि 5 मार्च रोजी होणार आहेत. तर 8 मार्चला महाअंतिम सामन्याचा थरार रंगणार आहे.

राखीव दिवसाची तरतूद

या स्पर्धेतील दहाव्या पर्वातील काही सामने पावसामुळे रद्द करावे लागले. सामना रद्द झाल्यास 1-1 गुण देण्यात येतो. मात्र तो नियम साखळी फेरीत लागू असतो. इथे उपांत्य फेरी म्हणजे 1 घाव आणि 2 तुकडे. अंतिम फेरीच्या हिशोबाने विजयी-पराभूत संघ निश्चित करणं गरजेचं असतं. मात्र हवामानाचं कुणाच्या हातात नाही. कधी काय होईल याचा अंदाज लावणंही अशक्य आहे. त्यामुळे कोणताही पेचप्रसंग निर्माण होऊ नये म्हणून आयसीसीच्या स्पर्धेतील बाद फेरीतील सामन्यांसाठी खबरदारी म्हणून राखीव दिवस ठेवला जातो. मात्र सामना मुख्य दिवशीच कसा पार पडेल आणि निकाली निघेल यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न केला जातो. तसेच राखीव दिवसाबाबतही काही नियम आहेत. या नियमांबाबत जाणून घेऊयात.

उपांत्य फेरीतील दोन्ही सामन्यांसाठी राखीव दिवसाची तरतूद आहे. मुख्य दिवशीच सामना निकाली काढण्याचा प्रयत्न असणार आहे. त्यासाठी आयसीसीकडून अतिरिक्त वेळही देण्यात आला आहे, जेणेकरुन सामना राखीव दिवसापर्यंत पोहचणारच नाही. सामन्याच्या मुख्य दिवशी दीड तर राखीव दिवशी 2 अतिरिक्त तासांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच उपांत्य फेरीतील सामन्याचा निकाल लागण्यासाठी किमान 10 ओव्हरचा खेळ बंधनकारक आहे.

राखीव दिवसाबाबत

तसेच काही केल्या सामन्याच्या मुख्य दिवशी निकाल लागला नाही तर रिझर्व्ह डेमध्ये निकाल लागेल. मुख्य दिवशी खेळ जिथे थांबवण्यात आला होता तिथूनच राखीव दिवसाच्या खेळाला सुरुवात होईल. महत्त्वाची बाब म्हणे उपांत्य फेरीतील सामन्यांना संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. मात्र सामना राखीव दिवसात पोहचला तर उर्वरित खेळाची दुपारी 3 वाजेपासून सुरुवात होईल.

राखीव दिवसात सामना कुठून सुरु होणार?

राखीव दिवसात सामना कुठून सुरु होणार? यात 2 मुद्दे महत्त्वाचे आहेत. समजा सामना मुख्य दिवशी सुरु झाला. त्यानंतर कोणत्याही कारणामुळे मुख्य दिवशी ज्या ठिकाणी खेळ थांबवला असेल तिथूनच राखीव दिवसाच्या खेळाला सुरुवात होईल. तसेच मुख्य दिवशी कोणत्याही कारणामुळे ओव्हर कमी करण्यात आल्या असतील तर राखीव दिवशीही तेवढ्याच षटकांचा खेळ होईल.

तसेच मुख्य दिवशी सामन्याला सुरुवात झालीच नाही तर राखीव दिवसात खेळ होईल. तसेच शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राखीव दिवशी खेळ होऊनही निकाल न लागल्यास काय? तर त्याचंही उत्तर आहे. राखीव दिवशी निकाल न लागल्यास उपांत्य फेरीतील दोघांपैकी सुपर 8 ग्रुपमध्ये अव्वल स्थानी असलेला संघ फायनलसाठी पात्र ठरेल. त्यानुसार सुपर 8 ग्रुप 1 मधून दक्षिण आफ्रिका पहिल्या तर टीम इंडिया दुसऱ्या स्थानी विराजमान आहे. तर सुपर 8 ग्रुप 2 मधून इंग्लंड पहिल्या तर न्यूझीलंड दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे समजा जर राखीव  दिवशीही सामना न झाल्यास इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका अंतिम फेरीत पोहचतील.

Follow Us