T20 WC: उपांत्य फेरीचा निकाल लावण्यासाठी किती षटकांचा खेळ आवश्यक? जाणून घ्या आयसीसीचा नियम
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील साखळी आणि सुपर 8 फेरीचा थरार संपलेला आहे. आता उपांत्य फेरीची उत्सुकता आहे. भारत, इंग्लंड, न्यूझीलंड आणि दक्षिण अफ्रिकेने उपांत्य फेरी गाठली आहे. त्यामुळे उपांत्य फेरीत पाऊस पडला तर काय? असे प्रश्न पडले आहेत. तर जाणून घेऊयात यासाठी आयसीसीचे नियम काय आहेत ते..

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या लढती ठरल्या आहेत. पहिला उपांत्य फेरीचा सामना 4 मार्च रोजी न्यूझीलंड आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात होणार आहे. हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डनवर होणार आहे. तर दुसरा उपांत्य फेरीचा सामना 5 मार्च रोजी भारत आणि इंग्लंड यांच्यात होईल. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होईल. उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी एक दिवस राखीव ठेवला आहे. 4 मार्चचा सामना काही कारणास्तव झाला नाही तर 5 मार्चला होईल. तसंच 5 मार्चच्या सामन्यासाठी 6 मार्च हा राखीव दिवस आहे. राखीव दिवशी हा सामना झाला नाही तर काय? मग या सामन्याचा निकाल कसा लावणार असा प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही. सेमीफायनल सामन्याचा निकाल देण्यासाठी कमीत कमी किती सामने खेळणं आवश्यक आहे. चला जाणून घेऊयात याबाबत सविस्तर
उपांत्य फेरीच्या निकालासाठी किती षटकं टाकणं आवश्यक?
टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या सामन्यावर तसं पाहिलं तर पावसाचं काही सावट नाही. पण निसर्गाच्या लहरीपणाचं काही सांगता येत नाही. श्रीलंकेत पार पडलेल्या काही सामन्यांमध्ये पाऊस पडल्याने सामने रद्द करण्याची वेळ आली. पण उपांत्य फेरीत असं करून चालणार नाही. कारण अंतिम फेरीत कोण जाणार? हे ठरवावं लागणार आहे. आयसीसीच्या नियमानुसार, उपांत्य फेरीच्या सामन्याचा निकाल जाहीर करण्यासाठी दोन्ही संघांनी किमान 10 षटकं खेळणं आवश्यक आहे.
दहा षटकांचा खेळ झाला नाही तर…
उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी आयसीसीने राखीव दिवस ठेवला आहे. त्यामुळे ठरलेल्या दिवशी सामना झाला नाही तर राखीव दिवशी खेळवला जाईल. पण राखीव दिवशीही 10-10 षटकांचा खेळ झाला नाही तर सामना रद्द केला जाईल. यावेळी निकाल हा सुपर 8 फेरीत टॉपला असलेल्या संघाच्या बाजूने लागेल. उदाहरण द्यायचं झालं तर, भारत आणि इंग्लंड यांच्यात उपांत्य फेरीचा सामना होणार आहे. हा सामना रद्द झाला तर इंग्लंडला अंतिम फेरीचं तिकीट मिळेल. कारण सुपर 8 फेरीत गट 2 मध्ये इंग्लंडचा संघ टॉपला आहे. तर भारतीय संघ गट 1 मध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे.
