टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारताला जिंकवण्यासाठी आयसीसी करतेय मदत? दिग्गज क्रिकेटपटूच्या आरोपाने खळबळ
टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत जागा मिळवणारा भारत हा चौथा संघ ठरला आहे. यानंतर पाकिस्तानला पोटदुखी झाली आहे. माजी क्रिकेटपटू आणि ऑफ स्पिनर सकलेन मुश्ताक याने आयसीसीवर गंभीर आरोप केले आहेत. नेमकं काय म्हणाला? जाणून घ्या.

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या सुपर 8 फेरीत भारताची सुरूवात निराशाजनक झाली. पण त्यानंतर टीम इंडियाने कमबॅक केलं. झिम्बाब्वेला पराभवाची धूळ चारली. तसेच करो या मरोच्या सामन्यात वेस्ट इंडिजला 5 गडी राखून मात दिली. या विजयानंतर भारताने उपांत्य फेरीत स्थान पक्कं केलं आहे. पण भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहोचल्याने पाकिस्तानला खूपच दु:ख झालं आहे. पाकिस्तानचे आजी माजी खेळाडू काहीही बरळत सुटले आहेत. भारतीय संघाने उपांत्य फेरी गाठल्याचं दु:ख त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट दिसत आहे. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू सकलेन मुश्ताकने भारताच्या विजयानंतर आयसीसीवर गंभीर आरोप केले आहेत. सकलेनने सांगितलं की, आयसीसी आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउंसिल नाही तर इंडियन क्रिकेट काउंसिल आहे. ते टीम इंडियाच्या हिशेबाने खेळपट्ट्या तयार करत आहेत.
सकलेन मुश्ताकने पाकिस्तानच्या स्पोर्ट्स शोमध्ये सांगितलं की, ‘सर्वात मोठं वाइल्डकार्ड पिच आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउंसिल टीम इंडियासाठी कशा खेळपट्ट्या करत आहे. टीम इंडियाच्या हिशेबाने खेळपट्टी बनवत आहेत. त्यामुळे त्यांना 10 ते 15 टक्के फायदा होत आहे. टीम इंडिया या परिस्थितीला चांगल्या पद्धतीने जाणते. ते त्यामुळे विरोधकांना अडचणीत आणत आहेत.’ सकलेन मुश्ताक यापूर्वी भारताविरुद्ध अनेकदा बरळला आहे. यापूर्वी टी20 वर्ल्डकप स्पर्धेत सकलेन मुश्ताकने आपल्या जावयाला वाचवण्यासाठी वादग्रस्त विधान केलं होतं. शादाब खानला पाठीशी घालताना त्याने थेट अक्षर पटेलच्या कामगिरीचं उदाहरण दिलं होतं. त्याची कामगिरी खास झाली नाही असं सांगत पाठराखण केली होती.
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत पाकिस्तानचे सर्व सामने एकाच ठिकाणी म्हणजेच श्रीलंकेत झाले. तरीही पाकिस्तानची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. साखळी फेरीत भारताने पाकिस्तानला मोठ्या फरकाने पराभूत केलं होतं. तर सुपर 8 फेरीत पाकिस्तानची कामगिरी काही खास राहिली नाही. इंग्लंडविरुद्धचा सामना गमावल्याने उपांत्य फेरीचं स्वप्न भंगलं. इतकंच काय तर श्रीलंकेविरुद्धही नेट रनरेटचं गणित सोडवू शकले नाहीत. टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील नामुष्कीनंतर पाकिस्तान संघात उलथापालथ होणार हे नक्की आहे.
