IND vs ENG : टीम इंडियाला मोठा धक्का, चौथ्या कसोटीत फक्त 10 खेळाडूंसह खेळणार! जाणून घ्या नियम
भारत आणि इंग्लंड यांच्यात चौथा कसोटी सामना सुरु आहे. भारताने पहिल्या डावात 300 धावांच्या आसपास मजल मारली आहे. भारताने चांगली खेळी केली तर यात आणखी भर पडू शकते. पण या सामन्यात भारताला ऋषभ पंतच्या रुपाने एक धक्का बसला आहे. कारण त्याचा डाव अर्ध्यावरच मोडला. आता त्याच्या जागी फलंदाजी कोण करणार? काय आहे नियम

इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाला पहिल्याच डावात मोठा धक्का बसला आहे. ख्रिस वोक्सचा चेंडूवर रिव्हर्स स्वीप खेळताना पंतच्या हाडावर चेंडू लागला. त्यामुळे त्याचं हाड मोडलं आहे. इंग्लंड संघाने यावेळी एलबीडब्ल्यूसाठी जोरदार अपील केली. पंचांनी नाबाद दिल्यानंतर डीआरएस घेतला. त्यात ऋषभ पंतला जीवदान मिळालं पण रिटायर्ड हर्ट होत तंबूत परतावं लागलं. ऋषभ पंत आता खेळणार नसल्याने ध्रुव जुरेल त्याच्या जागी विकेटकीपिंग करेल. लॉर्ड्स कसोटीतही पंत जखमी झाल्यानंतर त्यानेच विकेटकीपिंग केली होती. लॉर्ड्सवर ऋषभ पंतला झालेली दुखापत फार गंभीर नव्हती. त्यामुळे त्याने दोन्ही डावात फलंदाजी केली. पण या सामन्यात तसं नाही. त्यामुळे ध्रुव जुरेलला त्याच्या जागी फलंदाजी करण्याची संधी मिळेल का? तर याचं उत्तर नाही असं आहे.
ध्रुव जुरेल ऋषभ पंतच्या जागी विकेटकीपिंग करू शकतो, पण फलंदाजी करू शकत नाही. यासाठी आयसीसीचा नियम जबाबदार आहे. यात डोक्याला गंभीर दुखापत झाली तर खेळाडू प्लेइंग 11 मध्ये रिप्लेस केला जाऊ शकतो. या व्यतिरिक्त शरीराच्या इतर कोणत्याही भागाला दुखापत झाली तर रिप्लेसमेंट मिळत नाही. आयसीसी नियमानुसार, ‘कोणताही राखीव खेळाडू गोलंदाजी किंवा फलंदाजी किंवा कर्णधारपद भूषवू शकत नाही. फक्त पंचांच्या परवानगीनंतरच विकेटकीपिंग करू शकतो.’
2017 पर्यंत राखीव खेळाडूच्या विकेटकीपिंगचा नियम नव्हता. पण एमसीसीने गंभीर दुखापत किंवा आजारासाठी राखीव खेळाडूला विकेटकीपिंगची परवानगी देणारा नियम आणला. पण यासाठी पंचांनी परवानगी घेणं आवश्यक आहे. त्यामुळे चौथ्या निर्णायक कसोटीत भारताची पुरती वाट लागली आहे. कारण एक विकेट इंग्लंडला अशीच गिफ्टमध्ये मिळाली आहे. ऋषभ पंत जखमी झाल्याने आता फक्त 10 खेळाडूंना फलंदाजी करता येणार आहे. अशा स्थितीत भारताच्या अडचणीत वाढ होणार आहे.
BCCI shared the latest on Rishabh Pant post the end of play on Day 1 in Manchester.#WTC27 | #ENGvIND | More on the injury ➡️ https://t.co/dShGqM31r2 pic.twitter.com/1smX1cbAZ1
— ICC (@ICC) July 24, 2025
इंडियन एक्स्प्रेसच्या रिपोर्टनुसार, ऋषभ पंतच्या पायाच्या बोटाला फ्रॅक्टर आहे. त्यामुळे त्याला सहा आठवड्याचा आराम करण्याचा सल्ला दिला आहे. स्कॅनमध्ये फ्रॅक्चर असल्याचं दिसून आलं आहे. चौथ्या कसोटीच्या पहिल्या डावात ऋषभ पतंने 48 चेंडूत 2 चौकार आणि एक षटकार मारत 37 धावा केल्या होत्या.
