IND vs NAM : 2 ओव्हरमध्ये 5 विकेट्स, भारताची घसरगुंडी, नामिबियासमोर 210 धावांचं आव्हान

India vs Namibia, 1st Innings Highlights : भारताच्या टॉप आणि मिडल ऑर्डरमधील फलंदाजांनी दमदार बॅटिंग केली. मात्र नामिबियाने अखेरच्या क्षणी भारताला झटपट 5 झटके दिले. नामिबियाने यासह भारताला आणखी काही धावा जोडण्यापासून रोखण्यात यश मिळवलं.

IND vs NAM : 2 ओव्हरमध्ये 5 विकेट्स, भारताची घसरगुंडी, नामिबियासमोर 210 धावांचं आव्हान
Hardik Pandya Team India
Image Credit source: Social Media
| Updated on: Feb 12, 2026 | 10:28 PM

टीम इंडियाने आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील 18 व्या सामन्यात नामिबिया विरुद्ध विस्फोटक सुरुवात केली. मात्र अखेरच्या क्षणी नामिबियाच्या गोलंदाजांनी जोरदार कमबॅक केलं. नामिबियाने भारताला शेवटच्या 2 ओव्हरमध्ये 5 झटके देत मोठी धावसंख्या उभारण्यापासून यशस्वीरित्या रोखलं. मात्र त्यानंतरही नामिबियाला अवघड असं आव्हान मिळालं आहे. भारताने नामिबियासमोर 210 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. भारताने 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 209 धावा केल्या. त्यामुळे आता टीम इंडिया आपला सलग दुसरा सामना किती धावांनी जिंकणार? हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल.

संजू सॅमसन आणि इशान किशन ही भारताची सलामी जोडी टॉस गमावून बॅटिंगसाठी मैदानात आली. अभिषेक शर्मा याला आजारामुळे या सामन्याला मुकावं लागलं. त्यामुळे संजूला टी 20 वर्ल्ड कप पदार्पणाची संधी मिळाली. संजूने या संधीचा फायदा घेत स्फोटक सुरुवात केली. मात्र संजूने काही मोठ्या फटक्यांनंतर निराशा केली. संजू 8 बॉलमध्ये 3 सिक्स आणि 1 फोरसह 22 रन्स करुन आऊट झाला.

त्यानंतर तिलक वर्मा आणि इशान किशन या जोडीने नामिबियाच्या गोलंदाजांना फोडून काढलं. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी फक्त 31 बॉलमध्ये 79 रन्सची पार्टनरशीप केली. इशानने या दरम्यान 20 बॉलमध्ये अर्धशतक झळकावलं. इशानच्या रुपात भारताने दुसरी विकेट गमावली. इशानने सर्वाधिक 61 धावा केल्या. कॅप्टन सूर्यकुमार यादव याच्या रुपात भारताने तिसरी विकेट गमावली. सूर्याने 12 धावा केल्या. तिलक वर्मा याने 25 रन्स करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. त्यामुळे भारताचा स्कोअर 4 आऊट 124 असा झाला.

हार्दिक-शिवमची दे देणादण बॅटिंग

तिलकनंतर हार्दिक पंड्या आणि शिवम दुबे या ऑलराउंडर जोडीने नामिबियाचा समाचार घेतला. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी फक्त 39 बॉलमध्ये 81 रन्सची पार्टनरशीप केली. हार्दिक आऊट झाल्याने या पार्टनरशीपला ब्रेक लागला. हार्दिकने 28 बॉलमध्ये 52 रन्स केल्या. हार्दिकने या खेळीत 4 चौकार आणि 4 षटकार लगावले.

टीम इंडियाची पडझड

हार्दिक आऊट होताच टीम इंडियाची पडझड सुरु झाली. नामिबियाने भारताला शेवटच्या 2 ओव्हरमध्ये अवघ्या 5 धावांच्या मोबदल्यात 5 झटके दिले. शिवम दुबे 23, अक्षर पटेल 0 (गोल्डन डक), रिंकु सिंह 1 आणि अर्शदीप सिंह 0 वर (गोल्डन डक) आऊट झाला. त्यामुळे टीम इंडियाची 4 आऊट 205 वरुन 20 ओव्हरनंतर 9 आऊट 209 अशी झाली. नामिबियाचा कॅप्टन गेरहार्ड इरास्मस याने सर्वाधिक 4 विकेट्स मिळवल्या. तर इतर तिघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.