IND vs NZ Final : टीम इंडिया फायनलसाठी सज्ज, न्यूझीलंडचं काम तमाम करत सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड कप उंचावणार?

India vs New Zealand Icc T20i World Cup 2026 : टीम इंडिया सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात पहिला आणि एकूण तिसरा टी 20i वर्ल्ड कप जिंकण्यासाठी सज्ज झाली आहे. उभयसंघातील महाअंतिम सामन्याला रविवारी 8 मार्चला संध्यासाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे.

IND vs NZ Final : टीम इंडिया फायनलसाठी सज्ज, न्यूझीलंडचं काम तमाम करत सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड कप उंचावणार?
India vs New Zealand T20i World Cup 2026 Final
Image Credit source: Icc X account
| Updated on: Mar 08, 2026 | 2:32 AM

टीम इंडिया रविवारी 8 मार्चला आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील अंतिम सामन्यात खेळण्यासाठी उतरणार आहे. टीम इंडियासमोर या सामन्यात न्यूझीलंडचं आव्हान असणार आहे. टीम इंडियाची आयसीसी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात अंतिम फेरीत खेळण्याची ही चौथी तर न्यूझीलंडची दुसरी वेळ आहे. त्यामुळे न्यूझीलंडच्या तुलनेत टीम इंडियाकडे या स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळण्याचा अनुभव जास्त आहे. त्यामुळे टीम इंडिया या अनुभवाच्या जोरावर सोबतच घरच्या स्थितीत कशी कामगिरी करते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

न्यूझीलंडसमोर भारताचं कडवं आव्हान

सूर्यकुमार यादव याच्या खांद्यावर यजमान संघाच्या नेतृत्वाची धुरा आहे. तर बॉलिंग ऑलराउंडर असलेला मिचेल सँटनर न्यूझीलंडची या मैदानात कर्णधारपदाची धुरा सांभाळणार आहे. टीम इंडिया अंतिम फेरीत खेळण्यासह वर्ल्ड कप जिंकण्याबाबतही न्यूझीलंडपेक्षा सरस आहे. भारताने आतापर्यंत 2 वर्ल्ड कप जिंकले आहेत. तर न्यूझीलंडला एकदाही वर्ल्ड चॅम्पियन होण्याचा आनंद काय असतो याचा अनुभव नाही. न्यूझीलंड आणि टीम इंडिया या दोन्ही संघांचा प्रत्येकी 1 वेळा टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत पराभव झालाय. मात्र भारताकडे 2 ट्रॉफी असल्याचं समाधान आहे. तर न्यूझीलंडला ट्रॉफीची प्रतिक्षा आहे. त्यामुळे न्यूझीलंड क्रिकेट टीम त्यांच्या चाहत्यांची ही प्रतिक्षा संपवण्यात यशस्वी ठरणार की नाही? हे सामन्याच्या निकालानंतरच स्पष्ट होईल.

न्यूझीलंडसमोर संजू सॅमनला रोखण्याचं आव्हान

टीम इंडियाचा ओपनर आणि विकेटकीपर संजू सॅमसन याला या स्पर्धेच्या साखळी फेरीत काही खास करता आलं नाही. मात्र संजूने बाद फेरीत आणि निर्णायक सामन्यात आपली उपयुक्तता दाखवून दिली. संजूने वेस्ट इंडिज आणि त्यानंतर इंग्लंड विरुद्ध सलग अर्धशतक झळकावत भारताच्या विजयात खारीचा वाटा उचलला. त्यामुळे भारताला चांगली सुरुवात करण्यापासून रोखायचं असेल तर न्यूझीलंडला आधी संजूला रोखावं लागेल.

फिन एलेन आणि रचीन रवींद्र डोकेदुखी

टीम इंडियासाठी न्यूझीलंडचा ओपनर फिन एलेन आणि भारतीय वंशाचा ऑलराउंडर रचीन रवींद्र हे दोघे डोकेदुखी ठरु शकतात. फिन या स्पर्धेतील 10 व्या पर्वात सर्वाधिक धावा करणारा एकूण तिसरा तर न्यूझीलंडचा पहिला फलंदाज आहे. फिनने 7 डावांत 289 धावा केल्या आहेत. तसेच रचीन रवींद्र याने 7 सामन्यांमध्ये 11 विकेट्स मिळवल्या आहेत. तसेच रचीनला बॅटिंगने उल्लेखनीय कामगिरी करणं जमलं नाहीय. मात्र त्याने बॉलिंगने ही उणीव भरुन काढली आहे. त्यामुळे आता या महाअंतिम सामन्यात कोण वर्ल्ड चॅम्पियन ठरतो याचीच प्रतिक्षा साऱ्या क्रिकेट विश्वाला लागून आहे.

Follow Us