Rohit Sharma नंतर ‘हा’ असेल भारताचा पुढचा कॅप्टन, अक्रम, वकारने सांगितलं त्याचं नाव
वसिम अक्रम, वकार युनूसने 'त्या' भारतीय खेळाडूमध्ये असं काय बघितलं?

मुंबई: ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या टी 20 वर्ल्ड कप 2022 मध्ये टीम इंडियाने चांगली सुरुवात केली आहे. सलामीच्या सामन्यात पाकिस्तानवर विजय मिळवला. विराट कोहलीने 82 धावा फटकावून टीमच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. विराटमुळे टीम जिंकली, हे बरोबर आहे. पण अन्य खेळाडूंनी सुद्धा विजयात हातभार लावला.
अन्य खेळाडूंचही योगदान
भुवनेश्वर कुमार आणि अर्शदीप सिंहने जबरदस्त सुरुवात करुन दिली. अर्शदीपने पावरप्लेमध्ये पाकिस्तानच्या दोन ओपनर्सना पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. हार्दिकने बॉलिंग बरोबर बॅटिंगमध्येही महत्त्वाचा रोल प्ले केला. त्याने तीन विकेट काढल्या. त्याशिवाय विराट कोहलीसोबत शतकी भागीदारी केली. सांघिक प्रयत्नांमुळे टीम इंडियाने एक रोमांचक सामना जिंकला.
तो पुढचा कॅप्टन असू शकतो
मॅचनंतर टीम इंडियाच्या एका खेळाडूने पाकिस्तानचे महान क्रिकेटपटू वसिम अक्रम आणि वकार युनूस यांना प्रभावित केलं. तोच भारताचा पुढचा कॅप्टन असेल, असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे.
मिसबाह उल हक काय म्हणाला?
ए स्पोर्ट्सवरील या चर्चेत पाकिस्तानचा माजी कॅप्टन मिसबाह उल हक देखील सहभागी झाला होता. त्यावेळी मिसबाहने हार्दिक पंड्याच कौतुक केलं. “हार्दिक पंड्याने पहिल्यांदा आयपीएलमध्ये कॅप्टनशिप केली. त्याने आयपीएलमध्ये टीमला विजय मिळवून दिला. त्यावरुन तो प्रेशर कसं हँडल करतो, ते दिसतं. त्याचा टीममध्ये फिनिशरचा रोल आहे. तुम्ही मानसिक दृष्टया कणखर असाल, तुमचा स्वत:वर विश्वास असेल, तेव्हाच तुम्ही फिनिशर म्हणून टीममध्ये असता. इनिंग पुढे कशी घेऊन जायची, त्याचा तो विचार करत होता” असं मिसबाह म्हणाला.
त्याचा एक प्रभाव आहे
तितक्या वकार बोलला, “भारताचा पुढचा कॅप्टन हार्दिक पंड्या झाला, तर मला आश्चर्य वाटणार नाही” वसिम अक्रमनेही यावर आपलं मत मांडलं. “आधी तो आयपीएलमध्ये कॅप्टन झाला. तिथे जिंकला. आता टीममध्ये तो मुख्य शक्ती आहे. तो कॅप्टनला सल्ला देतो. त्याचा एक प्रभाव आहे. तो शिकतोय” असं अक्रमने म्हटलं.
