IND vs PAK : ईशानची स्फोटक खेळी, टीम इंडियाचा वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानसमोर मोठा रेकॉर्ड

India Highest Total Against Pakistan In T20i World Cup : भारतीय क्रिकेट संघाने सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात पाकिस्तान विरुद्ध टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत मोठा विक्रम केला आहे.

IND vs PAK : ईशानची स्फोटक खेळी, टीम इंडियाचा वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानसमोर मोठा रेकॉर्ड
Ishan Kishan Team India
Image Credit source: Bcci x Account
| Updated on: Feb 15, 2026 | 9:55 PM

ओपनर इशान किशन याने केलेल्या तोडफोड खेळीच्या जोरावर भारतीय क्रिकेट संघाने आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील 27 व्या सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानसमोर 176 धावांचं आव्हान ठेवलं आहे. भारताने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 175 धावा केल्या. टीम इंडियासाठी एकूण 5 फलंदाजांनी दुहेरी आकडा गाठला. तर 2 प्रमुख फलंदाजांना भोपळाही फोडता आला नाही. तर पाकिस्तानच्या फिरकीपटूंनी चिवट बॉलिंग करत भारताला मोठी धावसंख्या करण्यापासून रोखलं. मात्र तरीही टीम इंडियाने इतिहास घडवला.टीम इंडियाची टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासातील 175 ही सर्वोच्च धावसंख्या ठरली. टीम इंडियाने यासह स्वत:चाच रेकॉर्ड ब्रेक केला. टीम इंडियाने याआधी 2022 साली पाकिस्तान विरुद्ध 6 विकेट्स गमावून 160 धावा केल्या होत्या. अशात आता टीम इंडिया 175 धावांचा यशस्वी बचाव करुन सलग तिसरा विजय मिळवणार की पाकिस्तान विजयासह सुपर 8 मध्ये पोहचणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

टीम इंडियाची निराशाजनक सुरुवात

पाकिस्तानने नाणेफेक जिंकून भारताला बॅटिंगसाठी भाग पाडलं. पाकिस्तानने भारताला पहिल्याच ओव्हरमध्ये झटका दिला. अभिषेक शर्मा पुन्हा झिरोवर आऊट झाला. अभिषेकची या स्पर्धेत झिरोवर आऊट होण्याची ही सलग दुसरी वेळ ठरली.

इशानचा तडाखा

अवघ्या 1 धावेवर विकेट गमावल्यानंतर इशान किशन याने तिलक वर्मासोबत दुसऱ्या विकेटसाठी धमाका केला. इशानने चौफेर फटकेबाजी करत पाकिस्तानच्या गोलंदाजीची हवा काढली. इशानने पाहता पाहता अर्धशतक झळकावलं. इशानने अर्धशतकानंतर फटकेबाजी करत धावांचा वेग कायम ठेवला. मात्र सॅम अय्युब याने इशानला आऊट केलं. इशानने सर्वाधिक 77 धावा केल्या.

त्यानंतर तिलक वर्मा, कॅप्टन सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे या तिघांनी किल्ला लढवला. या तिघांनी झुंज दिली. मात्र या तिघांपैकी एकालाही फटकेबाजी करुन पाकिस्तानच्या गोलंदाजांवर कुरघोडी करता आली नाही.  हार्दिक पंड्या याला भोपळाही फोडता आला नाही.  तिलकने 25 आणि शिवमने 27  धावा केल्या. तर कॅप्टन सूर्यकुमार यादव याने 32 धावांचं योगदान दिलं. तर अखेरच्या क्षणी रिंकु सिंह याने 4 बॉलमध्ये 1 फोर आणि 1 सिक्ससह निर्णायक आणि नाबाद 11 धावा जोडल्या.  रिंकूने केलेल्या या निर्णायक खेळीमुळे भारताला पाकिस्तानन विरुद्ध टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत मोठी धावसंख्या उभारता आली.

टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत भारत-पाक यांच्यातील सर्वोच्च धावसंख्या

टीम इंडिया, 175 धावा, 2026

टीम इंडिया, 160 धावा, 2022

पाकिस्तान, 159 धावा, 2022

टीम इंडिया, 157 धावा, 2007