मुंबईत जीवघेणा पाऊस, 12 जणांचा मृत्यू; मानखुर्दच्या दुर्घटनेवर कोण काय-काय म्हणालं? जाणून घ्या
mankhurd chawl collapse : महामुंबईत भीषण दुर्घटना घडून 12 जणांचा मृत्यू झाला आहे. तर मुंबईच्या मानखुर्दमध्ये तीन मजली इमारत कोसळून 6 जणांचा मृत्यू झाला.

मुंबईत गेल्या 6 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या मुसळधार पावसामुळे मुंबईतील विविध भागात भीषण दुर्घटना घडल्या आहेत. आतापर्यंत महामुंबईत वेगवेगळ्या दुर्घटनेत 12 जणांचा मृत्यू झाला आहे. चेंबूर,कुर्ला, मानखुर्द या भागात भीषण दुर्घटना घडल्या आहेत. मानखुर्दमध्ये 3 मजली इमारत कोसळून 6 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात 5 बालकांचा समावेश आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच प्रशासन मदतीला धावले आहेत. या घटनास्थळी मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनीही भेट दिली. त्यानंतर प्रशासनाला तातडीने मदतीचे निर्देश दिले आहेत.
मानखुर्दच्या जनतानगरमध्ये 3 मजली घर कोसळल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळतात NDRF, अग्निशमन दल, पोलीस आणि BMC कडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आलं. या दुर्घटनेवर महापौर रितू तावडे म्हणाल्या, मानखुर्द दुर्घटनेत ५ बालकांसह ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून जखमीवर उपचार सुरू आहेत. दुर्घटनेनंतर एनडीआरएफ, अग्निशमन दल, पोलीस आणि महापालिकेने तातडीने बचावकार्य हाती घेतले. मृतांच्या कुटुंबीयांची गोवंडी शताब्दी रुग्णालयात भेट घेऊन घेतली, प्रशासन सर्वतोपरी मदत करणार आहे. जखमीची प्रकृती स्थिर असून बाधित कुटुंबांच्या पाठीशी महापालिका ठामपणे उभी आहे’.
स्थानिक नगरसेवक नवनाथ बन म्हणाले, सदर जागा ही कलेक्टरटची जागा आहे. या जागेत अनेक वर्षांपासून झोपड्या बांधून राहताहेत. मुंबईत दोन-तीन मजली इमारती बांधणे अनधिकृत आहेत. तरी देखील तीन मजली घरे बांधून राहत आहेत. त्यामुळे अशा दुर्घटना घडतात. खरंतर स्ट्रक्चरल ऑडिट करून खबरदारी घेणे गरजेचे आहे. साधारण तीन मजली इमारतीचं बांधकाम हे बाजूच्या एक मजली घरावर कोसळलं. या घरात एकूण 6 जण होते. त्यात मुले, महिलेचा समावेश होता. घटनेनंतर तातडीने सर्व जण घटनास्थळी मदतीला पोहोचले. मोठ्या प्रमाणात मलबा कोसळल्याने घटनेत 6 जणांचा मृत्यू झाला’
मंत्री गिरीश महाजन यांनी घटनास्थळी भेट दिली. मंत्री गिरीश महाजन म्हणाले, ‘मानखुर्दच्या जनतानगरमध्ये घडलेली दुर्घटना अत्यंत दुर्दैवी आहे. मी नाशिकहून थेट घटनास्थळी पोहोचलो असून परिस्थितीची पाहणी केली. या परिसरात अत्यंत अरुंद गल्ल्या असून एकावर एक मजले चढवून घरे बांधण्यात आली आहेत. तळमजल्यावरील सुमारे 12 बाय 12 फुटांच्या घरांवर तीन-तीन मजले उभारण्यात आले आहेत. ही बहुतांश बांधकामे अनधिकृत स्वरूपाची आहेत. या दुर्घटनेत आतापर्यंत एकूण 6 जणांचा मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी अद्याप माझी चर्चा झालेली नाही. मात्र, प्रचलित नियमांनुसार मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत मिळेल’.
9 तासानंतर ढिगाऱ्याखाली अडकलेली शेळी जिवंत
मानखुर्द दुर्घटना ढिगाऱ्याखालून एक शेळी बाहेर काढण्यात अग्निशमन दलाला यश आलं. आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू झालाय. मात्र मलब्याखालील शेळी जिवंत आढळली. जवळपास ९ तास ढिगाऱ्याखाली अडकलेली शेळी जिवंत बाहेर निघाली. अग्निशमन दल आणि RDMC च्या माध्यमातून रात्रभर काम सुरू होतं.
