IND vs SA : बॉलिंग की फिल्डिंग? कॅप्टन केएलने भारताच्या पराभवाचं खापर कुणावर फोडलं? म्हणाला…

KL Rahul Post Match Presentation: टीम इंडियाचे गोलंदाज रायपूरमध्ये 358 धावांचा बचाव करण्यात अपयशी ठरले. भारताच्या या पराभवानंतर कॅप्टन केएल राहुल याने काय म्हटलं? जाणून घ्या.

IND vs SA : बॉलिंग की फिल्डिंग? कॅप्टन केएलने भारताच्या पराभवाचं खापर कुणावर फोडलं? म्हणाला...
KL Rahul Post Match Presentation
Image Credit source: Social Media
Updated on: Dec 03, 2025 | 11:46 PM

भारताला रायपूरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 358 धावा करुनही पराभूत व्हावं लागलं. दक्षिण आफ्रिकेने एडन मार्रक्रम याच्या शतकी खेळीच्या जोरावर 359 धावांचं आव्हान हे 6 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. दक्षिण आफ्रिकेने यासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली. ऋतुराज गायकवाड आणि विराट कोहली या जोडीने शतक करुन भारताला 350 पार पोहचवण्यात निर्णायक भूमिका बजावली. मात्र एडन मार्रक्रम याचं शतक आणि इतर फलंदाजांनी दिलेल्या योगदानाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने विदेशात सर्वोच्च धावसंख्येचा यशस्वी पाठलाग केला. भारताच्या या पराभवानंतर कर्णधार केएल राहुल याने चुकांवर बोट ठेवलं. भारताचं नक्की कुठे चुकलं? याबाबत केएलने प्रतिक्रिया दिली.

भारताच्या पराभवाला दव (Dew) प्रमुख कारण असल्याचं केएलला वाटतं. ड्यू फॅक्टर लक्षात घेत बॉलिंग किती अवघड होती? यावर केएल व्यक्त झाला. “हे अवघड नाही, कारण ड्यू फार जास्त आहे. तसेच दुसऱ्या डावात बॉलिंग करणं फार अवघड आहे. आम्ही गेल्या सामन्यात चांगली कामगिरी केली होती” , असं केएलने म्हटलं.

“पंचांनी बॉल बदलण्यात चांगली भूमिका बजावली. तसेच टॉस फार निर्णायक भूमिका बजावतो. टॉस गमावल्याने मी स्वत:ला दोष देत आहे”, असंही केएलने म्हटलं. या मालिकेतील दोन्ही सामन्यात केएलच्या विरोधात नाणेफेकीचा कौल लागला.

केएल फिल्डिंगबाबत काय म्हणाला?

टीम इंडियाला चांगली फिल्डिंग करायला हवी होती, हे केएलने मान्य केलं. यशस्वी जैस्वाल याने एडन मार्रक्रम याचा कॅच सोडणं भारताला चांगलंच महागात पडलं.

“काही गोष्टी आहेत ज्या आम्ही आणखी चांगल्या पद्धतीने करु शकतो. 350 ही धावंसख्या ओके वाटत होती. मात्र गोलंदाजांना बचाव करण्यासाठी आणखी 20-25 धावा कशा करता येतील? यावर ड्रेसिंग रुममध्ये चर्चा झाली”, असं केएलने नमूद केलं.

केएलने ऋतुराज गायकवाड आणि विराट कोहली याच्या शतकाबाबत प्रतिक्रिया दिली. “ऋतु आणि विराटला बॅटिंग करताना पाहणं फार चांगलं होतं. तो त्याचं काम करत असतो. मात्र ऋतु फिरकी गोलंदाजांचा कसा सामना करतो हे पाहायचंय. ऋतुराजने ज्या वेगाने धावा केल्या त्यामुळे 20 धावा अतिरिक्त मिळाल्या”, असं केएल म्हणाला.

केएलला लोअर ऑर्डरकडून अपेक्षा

दरम्यान केएलने लोअर ऑर्डरमधील फलंदांजाकडून थोड्याफार धावांची आशा व्यक्त केली. “जर खालच्या फळीतील फलंदाजांनी आणखी थोडं योगदान देऊ 2 चौकार मारले असते, तर कदाचित 20 धावांमुळे आनंद वाटला असता”, असं म्हणत केएलने भविष्यात लोअर ऑर्डरमधील फलंदाजांकडून धावांची आशा व्यक्त केली आहे..