
दक्षिण आफ्रिकेने आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत सुपर 8 मधील तिसऱ्या आणि एकूण 43 व्या सामन्यात टीम इंडियासमोर 188 धावांचं आव्हान ठेवलं आहे. दक्षिण आफ्रिकेने अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 187 धावा केल्या. दक्षिण आफ्रिका आणि टीम इंडिया दोन्ही संघ साखळी फेरीत अजिंक्य राहत सुपर 8 पर्यंत पोहचले आहेत. त्यामुळे आता टीम इंडिया 188 धावा करुन सलग पाचवा सामना जिंकणार की दक्षिण आफ्रिका विजयी पंच लगावणार? हे निकालानंतरच स्पष्ट होईल.
एडन मार्करम याने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. मात्र अर्शदीप सिंह आणि जसप्रीत बुमराह या 2 वेगवान भारतीय गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेला झटपट 3 झटके दिले. या दोघांसमोर दक्षिण आफ्रिकेच्या टॉप ऑर्डरमधील फलंदाजांनी गुडघे टेकले. क्विंटन डी कॉक, एडन मार्करम आणि रायन रिकेल्टन या तिघांनी प्रत्येकी 7-7 चेंडूंचा सामना केला. या तिघांनी 6, 4 आणि 7 अशा धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेची 3 आऊट 20 अशी स्थिती झाली. मात्र त्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या त्रिकुटाने कमाल केली.
डेवाल्ड ब्रेव्हीस, डेव्हीड मिलर आणि ट्रिस्टन स्टब्स या तिघांनी टॉप गिअरमध्ये बॅटिंग केली. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला 187 धावांपर्यंत पोहचता आलं. डेवाल्ड आणि डेव्हीड या दोघांनी चौथ्या विकेटसाठी स्फोटक भागीदारी करुन दक्षिण आफ्रिकेला चांगल्या स्थितीत आणून ठेवलं. या दोघांनी 50 बॉलमध्ये 97 रन्सची पार्टनरशीप केली. दोघांनी या भागीदारी दरम्यान फटकेबाजी करुन टीम इंडियाचं आणि भारतीय चाहत्यांचं टेन्शन वाढवलं. या जोडीने टीम इंडियाचं टेन्शन वाढवलं होतं. मात्र शिवम दुबे याने ही जोडी फोडत टीम इंडियाची डोकेदुखी घालवली. डेवाल्डने 29 बॉलमध्ये 3 सिक्स आणि 3 फोरसह 45 धावांची खेळी केली.
त्यानंतर मिलरने स्टब्स याच्यासह पाचव्या विकेटसाठी 20 बॉलमध्ये 35 धावांची भागीदारी केली. त्यानंतर वरुण चक्रवर्ती याने मिलरला आऊट करत मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. मिलरने 35 चेंडूत 3 सिक्स आणि 7 फोरसह सर्वाधिक 63 धावा केल्या. तर ट्रिस्टन स्टब्स याने नाबाद 44 धावा करत फिनिशिंग टच दिला. स्टब्सने 24 बॉलमध्ये 44 रन्स केल्या. स्टब्सने या खेळीत 3 सिक्स आणि 1 फोर लगावला. टीम इंडियासाठी जसप्रीत बुमराह याने 3 विकेट्स मिळवल्या. अर्शदीप सिंह याने दोघांचा काटा काढला. तर वरुण चक्रवर्ती आणि शिवम दुबे या दोघांनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली.
दरम्यान टीम इंडियाला विजयी व्हायचं असेल तर इतिहास घडवावा लागणार आहे. टीम इंडियाने 2014 च्या टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेविरुद्धच सर्वोच्च 173 धावांचा यशस्वी पाठलाग केला होता. त्यामुळे आता टीम इंडिया 188 धावा करुन इतिहास घडवणार का? हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल.