
भारतीय क्रिकेट चाहत्यांना दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीआधी ज्याची भीती होती तसंच झालं आहे. भारताचा नियमित कर्णधार शुबमन गिल याला मानेच्या दुखापतीमुळे दुसर्या कसोटी सामन्याला मुकावं लागलं आहे. त्यामुळे शुबमनच्या अनुपस्थितीत उपकर्णधार ऋषभ पंत भारताच्या नेतृत्वाची सूत्र सांभाळणार आहे. टीम इंडिया या 2 सामन्यांच्या मालिकेत 0-1 ने पिछाडीवर आहे. त्यामुळे भारताला गुवाहाटीत काहीही करुन जिंकावं लागणार आहे. मात्र त्याआधी भारताच्या अडचणीत वाढ झाली आहे. भारताच्या ऑलराउंडरला दुसऱ्या कसोटीला मुकावं लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारताची डोकेदुखी वाढली आहे.
भारतीय संघ गुवाहाटीत सामना जिंकण्यासह मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी मैदानात उतरणार आहे. शुबमन टीम इंडियासह कोलकाताहून गुवाहाटीला गेला. तसेच शुबमनने सरावही केला. त्यामुळे शुबमन दुसऱ्या कसोटीपर्यंत फिट होईल, अशी आशा चाहत्यांना होती. मात्र शुबमन गुरुवारी 20 नोव्हेंबरला सराव सत्रात सहभागी झाला नाही. त्यामुळे शुबमन खेळणार नसल्याचं निश्चित झालं. त्यामुळे भारतीय संघ गुवाहाटीत होणाऱ्या सामन्यात ऋषभ पंत याच्या नेतृत्वात खेळणार आहे.
टीओआयच्या रिपोर्ट्सनुसार, शुबमनच्या जागी साई सुदर्शन याला संधी दिली जाऊ शकते. तसेच शुबमननंतर भारताचा ऑलराउंडर अक्षर पटेल यालाही गुवाहाटी कसोटीतून बाहेर केलं जाऊ शकतं. पहिल्या सामन्यातील पराभवानंतर भारतीय संघ दुसऱ्या कसोटीत संतुलित संघासह मैदानात उतरणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे संतुलित संघाच्या बांधणीच्या हिशोबामुळे अक्षरला प्लेइंग ईलेव्हनमधून बाहेर व्हावं लागू शकतं. तसेच टीम इंडिया गुवाहाटीत 4 ऐवजी 3 फिरकी गोलंदाजांसह मैदानात उतरु शकते. त्यामुळे अक्षरला बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो.
आता अक्षरला वगळल्यास त्याच्या जागी कुणाला संधी मिळणार? असा प्रश्नही क्रिकेट चाहत्यांकडून उपस्थित केला जात आहे. अक्षरच्या जागी ऑलराउंडर नितीश कुमार रेड्डी याला संधी दिली जाऊ शकते. रेड्डीच्या कमबॅकमुळे भारताला बॅटिंगचा पर्याय मिळेल.
आता अक्षर पटेल ऑलराउंडर असूनही त्याला का वगळलं जातंय? असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. कोलकाता कसोटीत वॉशिंग्टन सुंदर याने तिसऱ्या स्थानी समाधानकारक कामगिरी केली होती. त्यामुळे टीम मॅनेजमेंट सुंदरला तिसऱ्या स्थानी खेळवण्यासाठी आग्रही आहे.