
टीम इंडियाने रविवारी 1 मार्च रोजी आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेच्या उपांत्य फेरीचं तिकीट मिळवलं. टीम इंडियाने 2 वेळा वर्ल्ड कप जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजला पराभवाचा झटका देत सेमी फायनलमध्ये धडक दिली. टीम इंडियाची सेमी फायनलमध्ये पोहचण्याची ही सलग तिसरी तर एकूण सहावा वेळ ठरली. तर टीम इंडिया विरूद्धच्या पराभवामुळे वेस्ट इंडिजचा स्पर्धेतून बाजार उठला. टीम इंडियासाठी हा विजय फार खास ठरला. टीम इंडियाने या विजयासह वेस्ट इंडिजचा टप्प्यात कार्यक्रम करत एक जुना हिशोब चुकता केला आहे. टीम इंडियाने नक्की काय केलं? हे जाणून घेऊयात.
संजू सॅमसन याने केलेल्या नाबाद 97 धावांच्या जोरावर टीम इंडियाने वेस्ट इंडिज विरुद्ध 196 धावांचं आव्हान हे 19.2 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून सहज पूर्ण केलं. टीम इंडियाने यासह टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात सर्वात मोठ्या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग केला. टीम इंडियाने वेस्ट इंडिजला पराभूत करत स्पर्धेतून बाहेर केलं आणि 2016 सालच्या पराभवाची अचूक परतफेड केली.
वेस्ट इंडिजने टीम इंडियाला 2016 साली टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर केलं होतं. 31 मार्च 2016 रोजी टीम इंडिया विरुद्ध वेस्ट इंडिज सेमी फायनलमध्ये आमनेसामने होते. उभयसंघातील सामन्याचं आयोजन हे मुंबईतील ऐतिहासिक वानखेडे स्टेडियममध्ये करण्यात आलं होतं. विंडीजने भारताला उपांत्य फेरीत पराभूत करुन वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर केलं होतं. टीम इंडियाने या पराभवाची 10 वर्षांनंतर परतफेड केली.
रोहित शर्मा याने 43 तर अजिंक्य रहाणे याने 40 धावांचं योगदान दिलं होतं. कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने नाबाद 15 धावा केल्या होत्या. तर विराट कोहली याने सर्वाधिक रन्स केल्या. विराटने 47 बॉलमध्ये 1 सिक्स आणि 11 फोरसह सर्वाधिक नाबाद 89 धावांची खेळी केली. टीम इंडियाने अशाप्रकारे विंडीज विरुद्ध 2016 सालच्या सेमी फायनलमध्ये 20 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून 192 रन्स केल्या होत्या.
वेस्ट इंडिजने प्रत्युत्तरात 193 धावांचं आव्हान हे 2 बॉलआधी 7 विकेट्स राखून जिंकलं. विंडीजने 19.4 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 196 रन्स केल्या. लेंडी सिमन्स हा विंडीजच्या विजयाचा हिरो ठरला होता. लेंडीने नॉट आऊट 82 रन्से केल्या होत्या. आंद्रे रसे याने नाबाद 43 धावा केल्या होत्या. तर जॉन्सन चार्ल्सने 52 रन्सची खेळी करत विंडीजला विजयी करण्यात योगदान दिलं होतं.