
आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत टीम इंडिया गुरुवारी 26 फेब्रुवारीला सुपर 8 फेरीतील आपला दुसरा सामना झिंबाब्वे विरुद्ध खेळणार आहे. हा सामना चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियममध्ये होणार आहे. झिंबाब्वे आणि भारत दोन्ही संघांनी सुपर 8 मोहिमेतील आपला पहिला सामना मोठ्या फरकाने गमावला आहे. त्यामुळे दोन्ही संघांना नेट रनरेटमध्येही फटका बसला आहे. त्यामुळे आता भारत आणि झिंबाब्वेला उपांत्य फेरीचं तिकीट मिळवायचं असेल तर सामना जिंकणं गरजेचं आहे. त्यामुळे गुरुवारी एका संघाचं विजयासह आव्हान कायम राहिल. तर पराभूत संघाचं आव्हान संपुष्टात येईल, हे स्पष्ट आहे. या निमित्ताने भारत विरुद्ध झिंबाब्वे यांच्यातील टी 20i क्रिकेटच्या इतिहासातील आकडेवारी जाणून घेऊयात.
टीम इंडिया झिंबाब्वेवर टी 20i क्रिकेटच्या इतिहासात वरचढ असल्याचं आकड्यांवरुन स्पष्ट होतं. उभयसंघात टी 20i क्रिकेटमधील एमए चिदंबरम स्टेडियममध्ये होणारा हा एकूण 14 वा सामना असणार आहे. टीम इंडियाने झिंबाब्वेवर आतापर्यंत झालेल्या 13 पैकी सर्वाधिक सामन्यांत विजय मिळवला आहे. टीम इंडियाने झिंबाब्वेला 13 पैकी 10 सामन्यांत पराभूत केलंय. तर झिंबाब्वेने भारताचा 3 सामन्यांत धुव्वा उडवला आहे. त्यामुळे टीम इंडिया झिंबाब्वेला हलक्यात घेण्याची चूक करणार नाही.
टीम इंडिया 2024 च्या वर्ल्ड कप विजयानंतर पहिलीच मालिका झिंबाब्वे विरुद्ध खेळली होती. तेव्हा झिंबाब्वेने वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियाला मालिकेतील पहिल्याच सामन्यात पराभूत केलं होतं. मात्र त्यानंतर भारतीय संघाने उर्वरित 4 सामने जिंकले होते.
दरम्यान टीम इंडिया विरुद्ध झिंबाब्वे टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात एकदाच आमनेसामने आले आहेत. दोन्ही संघ 2022 च्या वर्ल्ड कप स्पर्धेत भिडले होते. सूर्यकुमार यादव याने केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर टीम इंडियाने तेव्हा झिंबाब्वे विरुद्ध 186 धावा केल्या होत्या. झिंबाब्वेला 187 या विजयी धावांचा पाठलाग करताना 20 ओव्हरही खेळता आलं नाही. टीम इंडियाने झिंबाब्वेला 17.2 ओव्हरमध्ये 115 रन्सवर गुं[डाळलं होतं. भारताने अशाप्रकारे हा सामना 71 धावांनी जिंकला होता. त्यामुळे टीम इंडिया एमए चिदंबरम स्टेडियममध्येही असाच मोठा विजय मिळवेल, असा विश्वास चाहत्यांना आहे.