
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत टीम इंडिया प्रबळ दावेदार आहे. त्याला कारण तसंच आहे. गेल्या काही वर्षात व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये टीम इंडियाची कामगिरी चांगली राहिली आहे. त्यामुळे सलग टी20 वर्ल्डकप जिंकण्याची संधी टीम इंडियाकडे आहे. आता काही योग देखील जुळून आले आहेत. त्यामुळे टीम इंडियाचे चाहते खूश झाले आहेत. हे काही तज्ज्ञ किंवा भारतीय चाहत्यांचं मत नाही, तर तसा योगच दिसत आहे. याचं कारण ठरला आहे ते झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियावर मिळवलेला विजय.. झिम्बाब्वेने गट ब मध्ये ऑस्ट्रेलियाला 23 धावांनी धोबीपछाड दिला आहे. त्यामुळे सुपर 8 फेरीचं ऑस्ट्रेलियाचं गणित चुकलं आहे. तर झिम्बाब्वे सुपर 8 फेरीत जागा मिळवेल अशी स्थिती आहे. या गटाशी टीम इंडियाचं काही देणं घेणं नाही. पण योग विजयाचं गणित जुळवून जात आहे.
क्रिकेट वर्ल्डकपच्या इतिहासात झिम्बाब्वेने तिसऱ्यांदा ऑस्ट्रेलियाला पराभवाची धूळ चारली आहे. जेव्हा झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं तेव्हा भारताने जेतेपदाची चव चाखली आहे. सर्वात पहिल्यांदा हा योग 1983 साली म्हणजेच 43 वर्षांपूर्वी जुळून आला होता. तेव्हा झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं होतं आणि भारताचे पहिल्यांदा वनडे वर्ल्डकप जिंकला होता. त्यानंतर झिम्बाब्वेने 2007 टी20 वर्ल्डकप स्पर्धेत ऑस्ट्रेलियाला मात दिली होती. तेव्हा भारताने जेतेपद मिळवलं होतं. आता 19 वर्षानंतर झिम्बाब्वेने पुन्हा एकदा ऑस्ट्रेलिया टी20 वर्ल्डकप स्पर्धेत पराभूत केलं आहे. त्यामुळे यंदाही भारत जेतेपद मिळवेल असं भाकीत काही क्रीडाप्रेमी वर्तवत आहेत.
खरं तर योग वगैरे जेतेपदाचं गणित काही सोडवत नाही. पण त्याची चर्चा होत असते. जेतेपदासाठी चांगल्या कामगिरीची गरज असते. मग योग जुळून यावा की नाही यावर काही ठरत नाही. भारताने या स्पर्धेत जबरदस्त सुरूवात केली आहे. पहिल्या सामन्यात अमेरिकेला, दुसऱ्या सामन्या नामिबियाला पराभूत केलं आहे. आता भारताचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. या सामन्यात विजय मिळवला तर सुपर 8 फेरीचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यानंतर सुपर 8 फेरीत तगडे संघ असून खरा कस लागणार आहे.