
चौथ्या कसोटी सामना भारताच्या हातून जवळपास निसटलेल्या स्थिती आहे. कारण इंग्लंडने पहिल्याच डावात 311 धावांची मजबूत आघाडी घेतली आहे. त्यामुळे ही धावसंख्या मोडून विजयासाठी आव्हान देणं वाटतं तितकं सोपं नाही. त्यात या धावांचा पाठलाग करताना भारताच्या आघाडीच्या फलंदाजांनी नांगी टाकली. पहिल्याच षटकात भारताने दोन गडी गमावले. दोन्ही विकेट शून्यावर बाद झाल्या. पहिल्या डावात अर्धशतक झळकावणारा सलामीवीर यशस्वी जयस्वाल फक्त 4 चेंडूत एकही धाव न काढता शून्य धावांवर बाद झाला. त्याच्या पाठोपाठ आलेल्या साई सुदर्शनची विकेट पहिल्याच चेंडूवर मिळाली. गोल्डन डकवर त्याला पॅव्हेलियनमध्ये परतावं लागलं. भारताच्या दुसऱ्या डावातील पहिल्याच षटकात इंग्लंडचा अनुभवी गोलंदाज क्रिस वोक्सने खळबळ उडवून दिली. पहिल्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर सलामीवीर यशस्वी जयस्वालला आणि पाचव्या चेंडूवर साई सुदर्शनला पॅव्हेलियनमध्ये पाठवले.
यशस्वी जयस्वाल आणि साई सुदर्शन हे दोघं खातं न खोलता तंबूत परतले. त्यांच्या या कामगिरीने 42 वर्षांपूर्वीचा कित्ता पुन्हा घडला आहे. 1983 नंतर पहिल्यांदाच भारताने कसोटी सामन्याच्या एका डावात खाते न उघडता दोन विकेट गमावल्या आहेत. डिसेंबर 1983 मध्ये चेन्नई येथे वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यात भारताने पहिल्या दोन विकेट एकही धाव न काढता गमावल्या होत्या. पहिल्या डावात यशस्वी जयस्वाल आणि साई सुदर्शन यांनी चांगली फलंदाजी केली होती. यशस्वी जयस्वालने 107 चेंडूत 58 धावा, तर साई सुदर्शनने 151 चेंडूत 61 धावा करून बाद झाले होते.
यशस्वी जयस्वाल वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत पाचव्यांदा शून्यावर बाद झाला आहे. त्याने इशांत शर्मा, अजिंक्य रहाणे आणि रवींद्र जडेजा यांचा विक्रम मोडला आहे. हे तिन्ही फलंदाज चार वेळा शून्यावर बाद झाले आहेत. यशस्वी जयस्वालने शुबमन गिल आणि उमेश यादवची बरोबरी साधली आहे. या दोघं 5-5 वेळा बाद झाले आहेत. जसप्रीत बुमराह या यादीत पहिल्या स्थानावर आहे. तो 23 वेळा शून्यावर बाद झाला आहे.