
टीम इंडियाने आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ च्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा ९६ धावांनी धुव्वा उडवत नवा इतिहास रचला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताने विजय मिळवत विजेतेपदावर नाव कोरले. या ऐतिहासिक विजयानंतर संपूर्ण महाराष्ट्र आनंदाने न्हाऊन निघाला. मात्र या जल्लोषाला काही ठिकाणी गालबोट लागल्याच्या घटना समोर आल्या आहेत. एकीकडे सर्वत्र विश्वविजेतेपदाचा जल्लोष सुरु असताना दुसरीकडे महाराष्ट्रातील सांगली, पुणे, अकोला आणि अमरावतीमध्ये तणावाच्या घटना समोर आल्या आहेत.
सांगलीच्या मिरजेतील लक्ष्मी मार्केट परिसरात विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी हजारो नागरिक जमले होते. सुरुवातीला शांततेत चाललेल्या या जल्लोषात काही तरुणांनी हुल्लडबाजी सुरु केली. पोलिसांनी वारंवार सूचना देऊनही गोंधळ थांबत नसल्याने अखेर पोलिसांनी सौम्य लाठीमार करत गर्दीला पांगवले. यामुळे काही काळ परिसरात तणाव निर्माण झाला होता.
तर दुसरीकडे, सांगली शहरात मारुती चौकात फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे एक मोठी दुर्घटना टळली. आतिषबाजीची ठिणगी एका दुकानाच्या छतावर साचलेल्या पालापाचोळ्यावर पडल्याने अचानक आग लागली. मात्र, फायरमन प्रसाद माने आणि त्यांच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. यानंतर त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. ज्यामुळे मोठी वित्तहानी टळली.
अकोल्यातील हरिहरपेठ भागात परिस्थिती गंभीर बनली होती. टी-20 विश्वचषकातील विजयानंतर फटाके फोडण्यावरून दोन गटांत वाद झाला. याचे रूपांतर भीषण दगडफेकीत झाले. सोनटक्के प्लॉट आणि गाडगेनगर भागात दोन गट आमनेसामने आल्याने चारचाकी वाहनांची तोडफोड करण्यात आली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. यात २ ते ३ नागरिक आणि काही पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत. अतिरिक्त पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. तर दोषींवर गुन्हे दाखल करण्यासाठी सध्या कोंबिंग ऑपरेशन सुरू आहे.
पुण्यातील प्रसिद्ध फर्ग्युसन रोडवर म्हणजेच FC रोडवर तरुणांनी विजयोत्सव साजरा करताना मोठ्या प्रमाणात हुल्लडबाजी केली. तरुणाईची अलोट गर्दी आणि हुल्लडबाजीमुळे वाहतूक कोंडी झाली होती. अखेर पोलिसांनी बळाचा वापर करत तरुणांना पांगवल्याचे पाहायला मिळाले.
तसेच अमरावती शहरातील राजकमल चौकात काही तरुणांनी चक्क एकमेकांच्या अंगावर फटाके फेकत जल्लोष केला. या जीवघेण्या प्रकारामुळे पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत मोठा बंदोबस्त तैनात केला. त्यानंतर गर्दी पांगवली. त्यासोबतच धुळे शहरात तरुणांनी ढोल-ताशांच्या गजरावर आणि डीजेच्या तालावर नाचत विजयाचा आनंद लुटला. तर भंडाऱ्यातील मुस्लिम लायब्ररी चौकात क्रिकेट प्रेमींनी मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतिषबाजी करत भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या.