INDW vs AUSW : कसोटी सामन्याचा पहिला दिवस ऑस्ट्रेलियाच्या नावावर, जेमिमाची अर्धशतकी खेळी

भारतीय महिला संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात एकमेव कसोटी सामना होत आहे. या सामन्यातील पहिला दिवस ऑस्ट्रेलियाच्या नावावर राहिला. पहिल्या दिवशी काय घडलं ते जाणून घ्या

INDW vs AUSW : कसोटी सामन्याचा पहिला दिवस ऑस्ट्रेलियाच्या नावावर, जेमिमाची अर्धशतकी खेळी
INDW vs AUSW : कसोटी सामन्याचा पहिला दिवस ऑस्ट्रेलियाच्या नावावर, जेमिमाची अर्धशतकी खेळी
Image Credit source: BCCI Women Twitter
| Updated on: Mar 06, 2026 | 8:13 PM

भारताने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात टी20 मालिका जिंकली आणि वनडे मालिकेत ऑस्ट्रेलियकडून व्हाईटवॉश मिळाला. आता भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघ यांच्यात एकमेव कसोटी सामना होत आहे. या कसोटी सामन्यात नाणेफेकीचा कौल हा ऑस्ट्रेलियाच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय योग्य होता असं म्हंटलं तर वागवं ठरणार नाही. कारण भारताचा पहिल्या दिवसाचा खेळ हा 198 धावांवर आटोपला. जेमिमा रॉड्रिग्स वगळता एकही फलंदाज साजेशी कामगिरी करू शकलं नाही. स्मृती मंधाना आणि शफाली वर्मा ही जोडी मैदानात उतरली होती. पण संघाच्या 18 धावा असताना स्मृती मंधाना बाद झाली. तिने फक्त 3 धावा केल्या आणि लुसी हॅमिल्टनच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाली. शफाली वर्माही फार काही तग धरू शकली नाही. 35 धावा करून बाद झाली. प्रतिका रावलही 43 चेंडूंचा सामना करत 18 धावांवर बाद झाली.

भारताकडून जेमिमा रॉड्रिग्सने 84 चेंडूत 7 चौकारांच्या मदतीने 52 धावांची खेळी केली. त्यामुळे टीम इंडियाला 198 धावांपर्यंत मजल मारता आली. हरमनप्रीत कौर 19, दीप्ती शर्मा 7, ऋचा घोष 11, स्नेह राणा 5, सायली सातघरे 7 आणि क्रांती गौड 1 धाव करून तंबूत परतले. तर काश्वी गौतमने 54 चेंडूत नाबाद 34 धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाकडून एनाबेल सुथरलँडने भेदक गोलंदाजी केली. तिने 17 षटकात 46 धावा देत 4 गडी बाद केले. तर लुसी हॅमल्टनने 3, डार्सी ब्राऊनने 2 आणि एशले गार्डनरने 1 गडी बाद केला.

भारताने पहिल्या डावात केलेल्या 198 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरूवात काही चांगली झाली नाही. अवघ्या 2 धावा असताना जॉर्जिया वोल तंबूत परतली. फोइबी लिचफिल्ड 9 धावांवर तंबूत परतली. तर एलिसा हिलीचा खेळ 13 धावांवर आटोपला. एलिसा पेरी नाबाद 43 आणि एनाबेल सुथरलँड नाबाद 20 धावांवर खेळत आहे. भारताकडून सायली सातघरेने 2 आणि क्रांती गौडने 1 विकेट काढली. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाने 3 गडी बाद 96 धावा केल्या आहे. अजूनही भारताकडे 102 धावांची आघाडी आहे. दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचे फलंदाज झटपट बाद करण्याचं आव्हान टीम इंडियासमोर असणार आहे.

Follow Us