टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अभिषेक शर्माची बॅट तळपणार! संजू सॅमसनने घेतली गॅरेंटी
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारत आणि न्यूझीलंड आमनेसामने येणार आहे. या सामन्यात जिंकणार तोच जेतेपदाचा मानकरी ठरणार.. त्यामुळे दोन्ही संघ जीवाची बाजी लावणार यात काही शंका नाही. असं असताना अभिषेक शर्माचा फॉर्म चिंतेचा विषय ठरला आहे.

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत अभिषेक शर्मावर टीम इंडिया मेहरबान झाली आहे. वारंवार फेल होऊनही त्याला संधी देत आहे. अभिषेक शर्मा या स्पर्धेतील फक्त एका सामन्यात आजारी असल्याने खेळला नाही. मात्र या व्यतिरिक्त सर्वच सामन्यात खेळला आहे. पण झिम्बाब्वेविरुद्धची खेळी वगळता सर्व सामन्यात निराशा केली आहे. उपांत्य फेरीच्या महत्त्वाच्या सामन्यात 7 चेंडूत 9 धावा करून बाद झाला. त्यामुळे अभिषेक शर्माने प्लेइंग 11 मध्ये नुसती जागा अडवून ठेवल्याचं दिसत आहे. अंतिम सामन्यात प्लेइंग 11 मध्ये ठेवायचं की नाही असा प्रश्न आता क्रीडाप्रेमींना पडला आहे. त्याच्या ऐवजी मधल्या फळीत रिंकु सिंहला संधी देण्याची मागणी होत आहे. तर ओपनिंग इशान किशन आणि संजू सॅमसनकडून करण्याचा सल्ला दिला जात आहे. पण असं सर्व असताना संजू सॅमसन अभिषेक शर्माच्या बचावासाठी पुढे आला आहे. त्याने अभिषेक शर्माची पाठराखण केली आहे.
संजू सॅमसनने अभिषेक शर्माबाबत सांगितलं की, ‘अभिषेक शर्मा अंतिम फेरीत मोठी खेळी करण्यात यशस्वी ठरेल. अंतिम फेरीत अभिषेक शर्माचा दिवस असेल. मला पूर्ण विश्वास आहे की अंतिम फेरीत अहमदाबादमध्ये चांगली कामगिरी करण्यात यशस्वी ठरेल. ‘ इतकंच काय तर संजू सॅमसनने वरूण चक्रवर्तीची पाठराखण केली आहे. एक वेळ अशी होती की अभिषेक शर्मासाठी संजू सॅमसनला बाहेर बसावं लागलं होतं. नामिबियाविरुद्धच्या सामन्यात अभिषेक शर्मा आजारी असल्याने संजूला प्लेइंग 11 मध्ये संधी मिळाली होती. पण पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात अभिषेकला घेतलं आणि संजू सॅमसनला बसवलं होतं. पण आज वेळ अशी आली आहे की संजू सॅमसनकडे कोणी बोट दाखवू शकत नाही.
कर्णधार सूर्यकुमार यादव अंतिम सामन्यात काही बदल करेल असं वाटत नाही. कारण दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात झालेल्या पराभवानंतर प्लेइंग 11 मध्ये बदल करण्यात आला होता. त्यानंतर झिम्बाब्वे, वेस्ट इंडिज आणि उपांत्य फेरीत त्याच प्लेइंग 11 सह खेळला होता. त्यामुळे अंतिम सामन्यात बदल करेल असं वाटत नाही. अभिषेक शर्मा हा प्लेइंग 11 चा भाग असेल. आता अंतिम फेरीत तरी टी20 वर्ल्डकप स्पर्धेचा शेवट गोड करणार की नाही हे सांगणं कठीण आहे. पण संपूर्ण स्पर्धेचं ऋण फेडण्याची शेवटची संधी आहे. अन्यथा टीम इंडियात जागा मिळवणं कठीण होईल.
