“आज रात्री आम्ही निवांत झोपू..”, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार फाफने सांगितलं आतापर्यंतचं दु:ख

| Updated on: Apr 26, 2024 | 12:04 AM

आयपीएल 2024 स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने सनरायझर्स हैदराबादला पराभवाचं पाणी पाजलं. सलग पराभवानंतर आरसीबीची गाडी रुळावरून उतरली होती. त्यामुळे संघातील आत्मविश्वासही कमी झाला होता. अखेर आरसीबीने स्पर्धेतील दुसरा विजय मिळवला आहे. या विजयानंतर आरसीबीचा कर्णधार फाफने आपलं मनातलं बोलून दाखवलं आहे.

आज रात्री आम्ही निवांत झोपू.., रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार फाफने सांगितलं आतापर्यंतचं दु:ख
Image Credit source: IPL/BCCI
Follow us on

आयपीएल 2024 स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला सात पराभवानंतर विजयाची चव चाखायला मिळाली आहे. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने पराभूत केलं होतं. त्यानंतर पंजाबला पराभूत करण्यात आरसीबीला यश आलं होतं. मात्र त्यानंतर सलग 7 पराभव सहन करावे लागले. काही सामन्यातील विजय हातातोंडाशी येऊन गेला. यामुळे आरसीबीचं प्लेऑफमधील स्थान डळमळीत झालं आहे. पण गणिती भाषेत काही अंशी आशा जिवंत आहेत. त्यामुळे आता उर्वरित प्रत्येक सामन्यात विजय मिळवणं गरजेचं आहे. याची जाणीव आरसीबी संघातील प्रत्येक खेळाडूला आहे. आरसीबीने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. सनरायझर्स हैदराबादसमोर विजयासाठी 207 धावांच आव्हान ठेवलं. मात्र सनरायझर्स हैदराबादचा संघ 171 धावाच करू शकला. बंगळुरुने हैदराबादला 35 धावांनी पराभूत केलं. या विजयानंतर आरसीबीच्या गोटात पुन्हा एकदा आनंदाचं वातावरण पसरलं आहे. या सामन्यातील विजयानंतर आरसीबीचा कर्णधार फाफ डु प्लेसिसने आपलं मन मोकळं केलं आहे.

आरसीबीचा कर्णधार फाफ डु प्लेसिस म्हणाला की, “गेल्या दोन सामन्यांमध्ये आम्ही चुरशीचा लढा दिला. हैदराबादने 270 प्लस धावा केल्या होत्या, त्या बदल्यात आम्ही 260 धावा केल्या. कोलकात्याविरुद्धचा सामना अवघ्या एका धावेने गमावला. आम्हाला निसटता पराभव सहन करावा लागला. पण संघाला आत्मविश्वास मिळविण्यासाठी सामने जिंकणे आवश्यक आहे. आज रात्री चांगली झोप लागेल.संघाला खोटा आत्मविश्वास देऊ शकत नाही. आत्मविश्वास देणारी एकमेव गोष्ट म्हणजे कामगिरी.”

“स्पर्धा खूपच चुरशीची आहे, संघ इतके मजबूत आहेत की तुम्ही 100 टक्के नसल्यास पराभव होईल. आता संघात इतरही धावा करत आहेत. स्पर्धेच्या पहिल्या हाफमध्ये फक्त विराट धावा करत होता. आता ग्रीनने धावा काढणे त्याच्यासाठी आनंदाची बाब आहे. आम्हाला माहित आहे की चिन्नास्वामी आमच्यासाठी खूपच अवघड आहे. बॉलिंग करणे अवघड आहे. आम्ही त्याची रेसिपी शोधण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु ते कठीण आहे.”, असं आरसीबीचा कर्णधार फाफ डु प्लेसिस म्हणाला.