IPL 2025 Auction : आयपीएल मेगा लिलावाआधी बीसीसीआयच्या मीटिंगमध्ये मोठा राडा, शाहांच्या निर्णयाकडे लक्ष!
आयपीएल 2025 आधी मेगा लिलाव पार पडणार आहे. या लिलावाधी एक बैठक घेण्यात आली होती. मात्र बीसीसीआय अध्यक्ष जय शाह यांच्यासमोरच प्रत्येक टीमच्या मालकांनी आपली वेगळी मत मांडली यावरून मोठा वाद होण्याची शक्यता आहे. बैठकीमध्ये कशावरून वातावरण तापलं ते जाणून घ्या.

टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर असून वन डे मालिका आता सुरू होणार आहे. मात्र भारतामध्ये येत्या आयपीएल 2025 च्या धर्तीवर मोठा वाद रंगलाय. बीसीसीआयचे सचिव जय शाह आणि आयपीएलमधील सर्व फ्रँचायसींची एक बैठक पार पडली. या बैठकीचं कारण म्हणजे आयपीएल 2025 मेगा लिलाव, येत्या हंगामाच्या लिलावाआधी खेळाडूंना रिटेन करण्याच्या मुद्द्यावरून बैठकीचं वातावरण चांगलंच तापलं. आयपीएलमध्ये खेळाडू रिटेन करण्याच्या नियनानुसार प्रत्येक संघ 4 खेळाडूंना रिटेन करू शकतो. त्यामध्येही दोनपेक्षा जास्त परदेशी आणि तीनपेक्षा जास्त भारतीय खेळाडू असू शकत नाहीत. यावरून वाद झाला आहे, तर मग फ्रँचायसीवाल्यांचं नेमकं काय मत आहे जाणून घ्या.
आयपीएल फ्रँचायसींच्या मालकांमध्ये खेळाडू कायम ठेवण्याबाबत समान मत नसल्याने बैठकीत वाद झाला. कारण केकेआरचा कॅप्टन शाहरूख खान त्याच्या संघातील जास्तीत जास्त खेळाडूंना कायम ठेवण्यासाठी आग्रह धरत आहे. तर त्याच्याविरूद्ध पंजाब किंग्जची मालकीण प्रीती झिंटा आणि सहमालक नेस वाडिया लिलावामध्ये जास्तीत जास्त नवीन खेळाडूंना घेण्यासाठी आग्रह करत आहेत. तर सनरायजर्स हैदराबादची मालकीण काव्या मारन आपल्या संघात विदेशी खेळाडूंना कायम ठेवण्याबाबत मत मांडत आहे. पण हे प्रत्येकजण अशी मागणी का करत आहे ते समजून घ्या.
केकेआर संघाचा मालक शाहरूख खान जास्तीत जास्त खेळाडू रिटेन करण्याची मागणी करत आहे. कारण गतवर्षीचा चॅम्पियन असल्याने एक दमदार टीम तयार झाली आहे. त्यामुळे पुन्हा नवीन संघ बांधणी करण्याची त्याची इच्छा नाही. त्यामुळे तो आहे त्या संघातील जास्तीत जास्त खेळाडू माघारी घेण्यासाठी भर देत आहे. तर पंजाब किंग्सचे याउलट मत आहे. आयपीएलमध्ये अजुन एकदाही पंजाब संघाला विजेतेपदावर नाव कोरता आलेलं नाही. त्यामुळे येत्या सीझनआधी ते आपला संघ तयार करण्यासाठी संघातील जास्तीत जास्त खेळाडूंना रिलीज करण्याचा विचार करत आहेत.
सनरायझर्स हैदराबादची मालकीण काव्या मारन हीचे तर याउलटच मत आहे. खेळाडूंना कायम ठेवण्याबाबत कोणतेही बंधन नसलं पाहिजे. याबाबतचा बीसीसीआयने संपूर्ण अधिकार टीमच्या मालकांना द्यावा, असं काव्या मारन हिचं मत आहे. कारण काही खेळाडूंची ताकद ही कॅप्ड खेळाडू आहेत तर काही अनकॅप्ड खेळाडू आहेत. विदेशी खेळाडूही अनेक संघाचे मॅचविनर आहेत. यावरून एक दिसून येतं की काव्या मारनच्या सनराजयर्स हैदराबाद संघाची ताकद विदेशी खेळाडू आहेत.
दरम्यान, आता येत्या आयपीएलआधी मेगा लिलाव असल्याने बीसीसीआय अशा मतभेदांनंतर काय निर्णय घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. प्रत्येक मालकाचं मत लक्षात घेत फ्रँचायसींना बीसीसीआय वेगळा काही पर्याय देते का याबाबत चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे.