RR vs MI : राजस्थान विरुद्ध मुंबई सामन्याआधी टीमला झटका, मॅचविनर खेळाडू मुकणार!
Rajasthan Royals vs Mumbai Indians IPL 2025 : मुंबई इंडियन्सने आयपीएल 2025 मध्ये सलग 5 सामने जिंकले आहेत. मुंबई या मोसमातील 11 वा सामना हा राजस्थान रॉयल्स विरुद्ध खेळणार आहे. हा सामना 1 मे रोजी होणार आहे.

वैभव सूर्यवंशी याच्या वादळी शतकाच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने सोमवारी 28 एप्रिलला गुजरात टायटन्सवर मात केली. राजस्थानने यासह सलग 5 पराभवानंतर पहिला विजय मिळवला. राजस्थानने गुजरातवर घरच्या मैदानात अर्थात सवाई मानसिंह स्टेडियम, जयपूर येथे 8 विकेट्सने मात केली. वैभव सूर्यवंशी या 14 वर्षांच्या युवा फलंदाजाने केलेल्या 101 धावांच्या जोरावर राजस्थानने आयपीएल 2025 मधील एकूण तिसरा विजय मिळवला. त्यानतंर आता राजस्थान या हंगामातील आपला पुढील सामना हा 1 मे रोजी खेळणार आहे. मात्र त्याआधी राजस्थानसाठी निराशाजनक बातमी समोर आली आहे.
संजू सॅमसनची खेळण्याची शक्यता कमी
राजस्थान गुरुवारी मुंबई इंडियन्स विरुद्ध भिडणार आहे. मात्र या सामन्यातही राजस्थानचा नियमित कर्णधार संजू सॅमसन याला खेळता येणार नसल्याचं म्हटलं जात आहे. संजूला गेल्या सलग 3 सामन्यांपासून दुखापतीमुळे खेळता आलं नाही. त्यामुळे संजूच्या अनुपस्थितीत युवा रियान पराग राजस्थानचं नेतृत्व करत आहे.
दिल्ली विरुद्धच्या सामन्यात संजूला दुखापत
स्पोर्ट्स तकने दिलेल्या वृत्तानुसार, संजू मुंबई विरूद्धच्या सामन्यासाठी उपलब्ध असण्याची शक्यता फार कमी आहे. त्यामुळे संजूला या सामन्याला मुकावं लागू शकतं. संजूची फिटनेस टेस्ट केली जाणार आहे. त्यानंतर संजूबाबत अंतिम निर्णय होणार आहे. संजू सॅमसन याला दिल्ली कॅपिट्ल्स विरूद्धच्या सामन्यात बॅटिंग करताना दुखापत झाली होती. तेव्हा संजूला रिटायर्ड हर्ट झाला होता. त्यानंतर संजूला सलग 3 सामन्यांत खेळता आलं नाही.
पहिल्या 3 सामन्यातही अनफीट
संजूला याआधी आयपीएल 2025 मधील राजस्थानच्या पहिल्या 3 सामन्यांमध्येही कॅप्टन म्हणून खेळता आलं नव्हतं. संजूला फिट नसल्यामुळे त्याला कॅप्टन्सी करता आली नाही. संजूला इंग्लंड विरूद्धच्या मालिकेत बोटाला दुखापत झाली होती. त्यामुळे संजू या पहिल्या 3 सामन्यांमध्ये बॅट्समन म्हणून खेळत होता. तेव्हाही रियान पराग यानेच राजस्थानचं नेतृत्व केलेलं.
दरम्यान राजस्थानला आयपीएल 2025 प्लेऑफमध्ये पोहचण्याची संधी फार कमी आहे. राजस्थानने उर्वरित सर्व सामने जिंकले तरच त्यांचं प्लेऑफमधील आव्हान कायम राहिल. राजस्थानने आतापर्यंत एकूण 10 सामने खेळले आहेत. राजस्थानला त्यापैकी फक्त 3 सामन्यातच विजयी होता आलं आहे.