IPL 2026, GT vs LSG: गुजरात टायटन्सकडून पराभव होताच ऋषभ पंतने असं फोडलं खापर, म्हणाला…

आयपीएल 2026 स्पर्धेत गुजरात टायटन्सने विजयी ट्रॅक पकडला आहे. पहिल्या दोन सामन्यात पराभवाचं तोंड पाहिल्यानंतर सलग दोन विजय मिळवले आहे. तर लखनौला पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. या पराभवानंतर कर्णधार ऋषभ पंतने आपलं मनोगत व्यक्त केलं आहे.

IPL 2026, GT vs LSG: गुजरात टायटन्सकडून पराभव होताच ऋषभ पंतने असं फोडलं खापर, म्हणाला...
IPL 2026, GT vs LSG: गुजरात टायटन्सकडून पराभव होताच ऋषभ पंतने असं फोडलं खापर, म्हणाला...
Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: Apr 12, 2026 | 7:40 PM

आयपीएल 2026 स्पर्धेतील 19वा सामना लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात पार पडला. या सामन्यात गुजरात टायटन्सचा वरचष्मा दिसला. नाणेफेकीचा कौल गुजरात टायटन्सने जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. कर्मधार शुबमन गिलचा हा निर्णय योग्यच ठरला असं म्हणायला हरकत नाही. कारण या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सचे फलंदाज फार काही चांगली कामगिरी करू शकले नाही. लखनौ सुपर जायंट्सने 20 षटकात 8 गडी गमवून 164 धावा केल्या आणि विजयासाठी 165 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान गुजरात टायटन्सने 18.4 षटकात फक्त 3 गडी गमवून पूर्ण केलं. या सामन्यात शुबमन गिल आणि जोस बटलर यांची अर्धशतकी खेळी महत्त्वाची ठरली आहे. या पराभवानंतर लखनौ सुपर जायंट्सला गुणतालिकेत मोठा धक्का बसला. कारण गुजरात टायटन्सने या विजयासह पाचवं स्थान गाठलं आहे. तर लखनौची सहाव्या स्थानी घसरण झाली आहे. या पराभवानंतर काय चुकलं याबाबत लखनौचा कर्णधार ऋषभ पंत याने सांगितलं.

आयपीएल स्पर्धेत कर्णधार ऋषभ पंत म्हणाला की, ‘धावा पुरेशा नव्हत्या. त्यांनी चांगली गोलंदाजी केली. मला वाटतं, अशा खेळपट्टीवर 170 ते 180 धावा ही खूप चांगली धावसंख्या आहे. पण, तुम्हाला माहिती आहे, विकेट पडत गेल्या  आणि त्यांनी आमच्यावर झटपट विकेट गेल्यानंतर पुरेसा दबाव टाकला. या खेळपट्टीवर 170 ते 180 धावा ही एक चांगली धावसंख्या आहे. तुम्हाला माहिती आहे, तुमच्याकडे संधी असतात. मी काही फार कठोर वागतो आहे असं म्हणणार नाही. पण सामन्यात संधी होत्या. आम्ही फक्त त्या संधींचं पुरेसं सोनं करू शकलो नाही.’

ऋषभ पंत म्हणाला की, फलंदाजीत एक उत्तम फळी आहे. पण तुम्हाला माहिती आहे, इथे स्पर्धा नुकतीच सुरू झाली आहे. आम्ही खेळाडूंवर दबाव टाकत नाही आहोत. कारण विशेषतः वरिष्ठ खेळाडूंना काय करायचं आहे हे माहीत आहे. असे काही प्रसंग येतात जेव्हा तुम्ही चांगली कामगिरी करू शकत नाही. पण त्याच वेळी, तुम्हाला माहिती आहे, संघातील विश्वास आणि श्रद्धा पुरेशी आहे. आम्हाला माहित आहे की तो लवकरच येईल. ही नेहमीच एक सकारात्मक गोष्ट आहे.’

Follow Us