…म्हणून केकेआरचा पराभव! कर्णधार अजिंक्य रहाणेने शेवटच्या षटकात काय घडलं ते सांगितलं

आयपीएल 2026 स्पर्धेत केकेआरची सुरुवात निराशाजनक झाली आहे. पहिल्या विजयासाठी अजून प्रतीक्षा करावी लागणार आहे. पण चौथ्या सामन्यात निसटता पराभव झाला. या पराभवाचं कारण कर्णधार अजिंक्य रहाणेने सामन्यानंतर सांगितलं.

...म्हणून केकेआरचा पराभव! कर्णधार अजिंक्य रहाणेने शेवटच्या षटकात काय घडलं ते सांगितलं
...म्हणून केकेआरचा पराभव! कर्णधार अजिंक्य रहाणेने शेवटच्या षटकात काय घडलं ते सांगितलं
Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: Apr 10, 2026 | 5:44 PM

आयपीएल 2026 स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्सची स्थिती नाजूक आहे. चार पैकी तीन सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं. तर एक सामना पावसामुळे रद्द झाला आणि 1 गुण मिळाला. कोलकात्याचा चौथा सामना लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध झाला. या सामन्यात केकेआरची पकड मजबूत दिसत होती. पण मुकुल चौधरीने एकट्याने खिंड लढवली आणि सामना जिंकवून दिला. शेवटच्या षटकात विजयासाठी 14 धावांची आवश्यकता होती. आवेश खानने पहिल्या चेंडूवर 1 धाव काढून मुकुल चौधरीला स्ट्राईक दिली. मुकुलने दुसऱ्या चेंडूवर षटकार, तिसरा आणि चौथा चेंडू निर्धाव, पाचव्या चेंडूवर षटकार आणि शेवटच्या चेंडूवर लेग बाय 1 धाव काढली. हा सामना कोलकात्याच्या खिशातून खेचून आणला. या पराभवानंतर केकेआरच्या चाहत्यांचा हिरमोड झाला आहे. असं असताना कर्णधार अजिंक्य रहाणेने या पराभवाचं विश्लेषण केलं आहे.

केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणे म्हणाला की, ‘मला वाटलं की या खेळपट्टीवर 180-185 ही खूप चांगली धावसंख्या होती. मोठे फटके खेळणे सोपे नव्हते. संथ खेळपट्टी आणि चेंडू थांबत येत होता. त्यामुळे फटका मारणे कठीण होते. पण शेवटी, मला वाटलं, फलंदाजाला श्रेय द्यावं लागेल. मुकुलने चांगली फलंदाजी केली. शेवटच्या षटकात आवेशला स्ट्राईकवर ठेवण्याचा प्रयत्न होता. पण पुन्हा, क्षेत्ररक्षणावरील निर्बंध आणि वेळेच्या मर्यादेमुळे आम्हाला पाच क्षेत्ररक्षक ठेवावे लागले. त्यामुळे गोलंदाजांसाठीही ते कठीण असते. जेव्हा वर्तुळात पाच क्षेत्ररक्षक असतात. विशेषतः शेवटचे षटक टाकताना, तेव्हा ते अवघड असते.”

मुकुल चौधरीने मारलेले सात षटकार हे लखनौच्या फलंदाजाने सातव्या किंवा त्याखालील क्रमांकावर फलंदाजी करताना मारलेले सर्वाधिक षटकार आहेत. आयपीएलमध्ये धावांचा पाठलाग करताना सातव्या किंवा त्याखालील क्रमांकावर फलंदाजी करताना डीजे ब्राव्होने 2018 च्या हंगामाच्या सलामीच्या सामन्यात वानखेडेवर मुंबईविरुद्ध सात षटकार मारले होते. आता मुकुलने त्या सात षटकारांची बरोबरी केली आहे.

शेवटच्या षटकाच्या पाचव्या चेंडूपूर्वी त्याचा विचार काय होता? याबाबत मुकुल चौधरीने सांगितलं की, माझा विचार असा होता की गोलंदाजाने चार अचूक चेंडू टाकले तरी, त्यातला किमान एक तरी माझ्या क्षेत्रात येईल. षटकार मारण्यासाठी मला फक्त एका चेंडूची गरज आहे. मी त्या चेंडूची वाट पाहत होतो. तो शेवटून दुसरा किंवा अगदी शेवटचा चेंडूही असू शकतो. पण मला खात्री होती की मी तो मारणारच.

Follow Us