IPL 2026, MI vs PBKS: मुंबई पंजाब भिडणार, हार्दिक पांड्याचा कस लागणार! आकडेवारी काय सांगते?

आयपीएल 2026 स्पर्धेतील 24व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स आमनेसामने येणार आहेत. खरं तर या सामन्यात हार्दिक पांड्याच्या कर्णधारपदाचा कस लागणार आहे. तर पंजाब किंग्सला विजयी रथ पुढे न्यायचा आहे.

IPL 2026, MI vs PBKS: मुंबई पंजाब भिडणार, हार्दिक पांड्याचा कस लागणार! आकडेवारी काय सांगते?
IPL 2026, MI vs PBKS: मुंबई पंजाब भिडणार, हार्दिक पांड्याचा कस लागणार! आकडेवारी काय सांगते?
Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: Apr 15, 2026 | 6:01 PM

आयपीएल 2026 स्पर्धेत पहिल्या टप्प्यातील सामने संपत आले आहेत. त्यामुळे यापुढे टॉप 4 मध्ये जागा मिळवण्यासाठी चुरशीची लढाई असणार आहे. या स्पर्धेच्या 24व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स हे संघ भिडणार आहे. या स्पर्धेत पंजाब किंग्सची कामगिरी जबरदस्त होत आहे. पंजाब किंग्सने श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात 4 सामने खेळले असून त्यापैकी 3 सामन्यात विजय मिळवला आहे. तर एक सामना पावसामुळे रद्द झाल्याने 1 गुण मिळाला आहे. पंजाबचा संघ 7 गुण आणि +0.720 नेट रनरेटसह दुसर्‍या स्थानावर आहे. तर मुंबई इंडियन्सची संघाची स्पर्धेतील स्थिती नाजूक आहे. संघात तगडी स्टार कास्ट असूनही पराभवाची मालिका सुरू आहे. मुंबई इंडियन्सने 4 पैकी 3 सामने गमावले आहेत. तर एका सामन्यात विजय मिळवला आहे. मुंबईच्या खात्यात 2 गुण असून -0.722 नेट रनरेटसह नवव्या स्थानावर आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सचा विजयासाठी चांगलाच घाम निघणार असं दिसत आहे.

पंजाब किंग्सविरुद्धचा सामना मुंबईचं होमग्राउंड असलेल्या वानखेडे स्टेडियमवर होत आहे. पण या मैदानात आरसीबीने मागच्या सामन्यात मुंबईला धूळ चारली होती. त्यामुळे मुंबई इंडियन्स संघावर दडपण असणार आहे. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स 34 वेळा आमनेसामने आले आहेत. दोन्ही संघांनी प्रत्येकी 17 सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे आकडेवारीत काहीच मागे पुढे नाही. पंजाब किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्सची सर्वोच्च धावसंख्या 223 आहे, तर त्यांची सर्वात कमी धावसंख्या 87 आहे. दुसरीकडे, पंजाब किंग्सने मुंबईविरुद्ध 230 धावांची सर्वोच्च धावसंख्या नोंदवली आहे, तर सर्वात कमी धावसंख्या 119 आहे.

मागच्या पर्वात पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात दोन सामने झाले. या दोन्ही सामन्यात पंजाब किंग्सने बाजी मारली. पहिल्या सामन्यात 7 गडी राखून, तर दुसऱ्या सामन्यात 5 गडी राखून विजय मिळवला. त्यामुळे या स्पर्धेत काय होते याकडे लक्ष लागून आहे. वानखेडेवर या दोन्ही संघात 10 सामने झाले आहेत. यापैकी 5 सामन्यात मुंबई इंडियन्स आणि पाच सामन्यात पंजाब किंग्सने बाजी मारली आहे. त्यामुळे दोन्ही संघाची आकडेवारी पाहिली तर तूल्यबल सामना दिसत आहे. पण मुंबई इंडियन्सला स्पर्धेतील पुढच्या प्रवासासाठी विजय खूपच महत्त्वाचा आहे.

Follow Us