
जगातील सर्वात लोकप्रिय तसेच सर्वात श्रीमंत टी 20 लीग असा लौकीक असलेल्या आयपीएल स्पर्धेतील 19 व्या मोसमाला शनिवार 28 मार्चपासून सुरुवात होत आहे. या हंगामातील सलामीच्या सामन्यात गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद अशी लढत होणार आहे. एम चिन्नास्वामी स्टेडियम या आरसीबीच्या घरच्या मैदानात सामन्याला सुरुवात होणार आहे. त्यामुळे आरसीबीला फुल्ल सपोर्ट असणार आहे. रजत पाटीदार याच्या नेतृत्वात आरसीबी 19 व्या मोसमात खेळणार आहे. तर इशान किशन सनरायजर्स हैदराबादच्या नेतृत्वाची धुरा सांभाळणार आहे. या सामन्यात आरसीबीचा अनुभवी फलंदाज विराट कोहली याच्याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.
विराटला या पहिल्याच सामन्यात मोठा विक्रम करण्याची संधी आहे. विराटला टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांबाबत नंबर 1 आशियाई फलंदाज होण्याची मोठी संधी आहे. सध्या हा विक्रम पाकिस्तानचा माजी ऑलराउंडर शोएब मलिक याच्या नावावर आहे. मलिकला मागे टाकण्यासाठी विराटला किती धावांची गरज आहे? हे आपण जाणून घेऊयात.
शोएब मलिकला मागे टाकण्यासाठी विराटला फक्त नि फक्त 29 धावांची गरज आहे. विराट बॅटिंगला लागला की किमान आणि सहज अर्धशतक करतो हे जगजाहीर आहे. विराटच्या नावावर आयपीएलमध्ये सर्वाधिक अर्धशतकांचा विक्रम आहे. त्यामुळे विराटसाठी 29 धावा करणं फार मोठा विषय नाही. त्यामुळे विराट सलामीच्या सामन्यात 29 धावांसह मलिकला मागे टाकण्यात यशस्वी ठरतो का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
विराट कोहली याने आतापर्यंत 414 टी 20 सामने खेळले आहेत. विराटने या 414 सामन्यांत 41.92 च्या सरासरीने आणि 134.67 च्या स्ट्राईक रेटने 13 हजार 543 धावा केल्या आहेत. विराटने या दरम्यान 105 अर्धशतकं आणि 9 शतकं झळकावली आहेत.
तसेच शोएब मलिक याने 557 टी 20 सामने खेळले आहेत. मलिकने या दरम्यान 13 हजार 571 धावा केल्या आहेत. मलिकने 83 अर्धशतकं लगावली आहेत.
दरम्यान टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा वर्ल्ड रेकॉर्ड हा वेस्ट इंडिजचा विस्फोटक माजी फलंदाज ख्रिस गेल याच्या नावावर आहे. ख्रिस गेल याने टी 20 कारकीर्दीतील 463 सामन्यांमध्ये तब्बल 14 हजार 562 धावा केल्या आहेत. तसेच गेलने या दरम्यान तब्बल 22 शतकं लगावली आहेत. गेलला टी 20 क्रिकेटमधून निवृत्त होऊन काही वर्ष झालीत. मात्र त्यानंतरही गेल याच्या नावावर सर्वाधिक टी 20 धावांचा विक्रम कायम आहे.