SRH vs RR: हैदराबादविरुद्धच्या सामन्यात रियान परागने एकही षटक रवींद्र जडेजाला दिलं नाही, कारण…
आयपीएल 2026 स्पर्धेत सलग चार विजयानंतर राजस्थान रॉयल्सला पाचव्या सामन्यात पराभवाचा धक्का बसला. सनरायझर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सचा 57 धावांनी पराभव केला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग याचे निर्णय आश्चर्यकारक होते. त्यावर त्याने सामन्यानंतर भाष्य केलं.

आयपीएल 2026 स्पर्धेच्या 21व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सचा विजयी रथ रोखला. सलग चार सामन्यात विजय मिळवल्यानंतर राजस्थान रॉयल्सला पाचव्या सामन्यात पराभवाला सामोरं जावं लागलं. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा राजस्थान रॉयल्सच्या बाजूने लागला आणि मनासारखा निर्णय घेता आला. कर्णधार रियान परागने धावांचा पाठलाग करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात अभिषेक शर्माची विकेटही पहिल्याच चेंडूवर मिळाली. त्यामुळे राजस्थानच्या गोटात आनंदाचं वातावरण होतं. पण हा आनंद फार काळ टिकू शकला नाही. इशान किशनने 91 आणि हेनरिक क्लासेनने 40 धावांची खेळी करून राजस्थानला बॅकफूटवर ढकललं. तिसऱ्या विकेटसाठी या जोडीने 88 धावांची भागीदारी केली होती. ही जोडी फोडण्यासाठी अनुभवी रवींद्र जडेजाला चेंडू सोपवलं अपेक्षित होतं. पण तसं केलं नाही. इतकंच काय तर कर्णधार रियान परागने संपूर्ण सामन्यात रवींद्र जडेजाला एकही षटक सोपवलं नाही.
आयपीएल स्पर्धेतील हैदराबादविरुद्धचा सामना संपल्यानंतर कर्णधार रियान परागने रवींद्र जडेजाला षटक न देण्याचं कारण सांगितलं. रियान पराग म्हणाला की, ‘मला वाटतं आमची सुरुवात खूप चांगली झाली. कदाचित इथे-तिथे काही गोष्टी करता आल्या असत्या. जड्डू भाई, मला माहीत नाही, तो अगदी क्षणार्धात घेतलेला निर्णय होता. ईशान खूप चांगली फलंदाजी करत होता, त्यामुळे मला ती जोखीम घ्यायची नव्हती. षटकांच्या बाबतीत बिश्नोईवर विश्वास ठेवला.’ रवींद्र जडेजाला षटक सोपवलं नाही. पण त्याने फलंदाजीत सावध कामगिरी केली. त्याने 32 चेंडूत 5 चौकारांच्या मदतीने 45 धावा केल्या.
रियान परागने पुढे सांगितलं की, ‘ ज्या प्रकारे खेळपट्टी खेळत होती, ते पाहता मला वाटलं की त्या षटकांमध्ये 30 धावांनी पुढे होते. जिथपर्यंत फलंदाजीचा प्रश्न आहे, मला वाटतं 9 धावांत पाच गडी गमावूनही 160 धावा करणे, हे आमच्या फलंदाजीच्या खोलीबद्दल बरंच काही सांगून जातं. या पराभवातून सावरून पुढे जायचं आहे. जसं मी म्हणालो, ही फक्त एक छोटीशी चूक आहे आणि आता आम्ही कोलकात्याला जाऊन काहीतरी चांगलं करू.’