
आयपीएल 2026 स्पर्धेचं जेतेपद कोण मिळवणार? याची चर्चा आतापासून सुरू आहे. खरं तर दोन महिन्यांनंतरच जेतेपदाचं मानकरी कळेल. पण संघांची बांधणी आणि खेळाडूंचा फिटनेस यावरून आधीच अंदाज बांधला जात आहे. आरसीबीने आयपीएल 2025 स्पर्धेचं जेतेपद मिळवलं होतं. त्यामुळे त्यांना यंदा जेतेपद राखण्याचं आव्हान असणार आहे. यासाठी आरसीबीचा संघ जोरदार तयारी करत आहे. विराट कोहलीने संघ सहकाऱ्यांना याबाबत इशाराही दिला आहे. दुसरीकडे, आरसीबी संघ जेतेपद राखेल का? असाही प्रश्न आहे. सलग दुसऱ्यांदा जेतेपदावर नाव कोरणार का? असा प्रश्न क्रीडाप्रेमी विचारत आहेत. असं असताना माजी क्रिकेटपटू आर अश्विनने आपलं मत व्यक्त केलं आहे. इतकंच काय पुढच्या दोन वर्षात काय होईल? याबाबत सांगितलं आहे. आर अश्विनच्या मते, आरसीबीचा संघ सध्या जबरदस्त आहे. त्यामुळे दोन वर्षात एक जेतेपद आरामात मिळवतील असं भाकीत वर्तवलं आहे.
आर अश्विनने आपल्या युट्यूब चॅनेलवर विश्लेषण करताना सांगितलं की, आरसीबीचा संघ पुढच्या दोन वर्षात आणखी एक जेतेपद नावावर करू शकतो. आयपीएल जिंकणं इतकं सोपं नाही. पण त्यांच्याकडे बिल्डिंग ब्लॉक्स आणि वन टू वन रिप्लेसमेंट आहे. ते खरंच कौतुकास्पद आहे. त्यांनी आपल्या संघातील उणीवा व्यवस्थितरित्या दूर केल्या आहेत. त्यामुळे टॉप 2 मध्ये फिनिश करण्यासाठी त्यांच्याकडे चांगला संघ आहे. आयपीएल 2026 स्पर्धेत आरसीबीचा पहिला सामना सनरायझर्स हैदराबादशी होणार आहे. हा सामना 28 मार्चला चिन्नास्वामी स्टेडियममध्ये होईल. या सामन्यातील कामगिरीवरून आरसीबीच्या पुढच्या कामगिरीचं आकलन केलं जाईल.
हेझलवूड संघात नसल्याने आरसीबीच्या गोटात चिंतेचं वातावरण आहे. दुसरीकडे, आर अश्विनचं याबाबत वेगळंच मत आहे. आर अश्विनने सांगितलं की, खरं सांगायचं तर हेझलवूडची दुखापत आरसीबीसाठी एक संधी आहे. जर आरसीबीकडे हेझलवूड नाही आणि ते सॉल्टच्या फॉर्मबाबत चिंतेत आहेत. तर ते सॉल्ट आणि बेथेल या दोघांना खेळवू शकतात. जेव्हा हेझलवूड परत येईल तेव्हा तुमच्या एक चांगली टीम असेल.