
अमेरिका-इस्राईल आणि इराण युद्धाची झळ आता संपूर्ण जगाला बसताना दिसत आहे. या युद्धातून भारतही सुटलेला नाही. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने सोशल मीडियावर एक निवेदन जारी केलं आहे. यात इंधन पुरवठ्यातील अडचणींमुळे घरगुती आणि आवश्यक नसलेल्या क्षेत्रांसाठी एलपीजी पुरवठ्याला प्राधान्य दिलं जाईल असं स्पष्ट सांगितलं आहे. त्यामुळे पुढे काय होईल याची चिंता भासू लागली आहे. याचा परिणाम आयपीएल 2026 स्पर्धेवरही होण्याची शक्यता आहे. जर परिस्थिती अशीच राहिली तर स्पर्धेचं आयोजन करणं कठीण होईल. बीसीसीआय या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. आयपीएल गर्व्हनिंग काउंसिलचे अध्यक्ष अरूण धुमल यांनी सांगितलं की, या प्रकरणाकडे गांभार्याने पाहिले जात आहे. धुमल द न्यू इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना म्हणाले की, ‘आम्ही परिस्थितीचा आढावा घेत आहोत. या युद्धात दररोज नवीन घडामोडी घडत आहेत. त्यामुळे सध्या काहीही निश्चितपणे सांगता येत नाही. आयपीएल 2026 स्पर्धा पुढील काही दिवसात सुरू होणार आहे. त्यावेळची तीव्रता पाहून आम्ही निर्णय घेऊ.’
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेनंतर लगेचच आयपीएल 2026 स्पर्धेची तारीख जाहीर करण्यात आली. 28 मार्चपासून स्पर्धेला सुरूवात होणार आहे.फ्रेंचायझींनी वेगवेगळ्या शहरात आधीपासून सराव शिबीर सुरू केले आहेत. चेन्नई सुपर किंग्सचं शिबीर गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. राजस्थान रॉयल्सनेही सरावाला सुरूवात केली आहे. पण असं असूनही वेळापत्रक काही जाहीर केलेलं नाही. त्यात काही राज्यातील निवडणुकांमुळे आयपीएलचं वेळापत्रक कोलमडण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच बाजूने बीसीसीआयला विचार करावा लागत आहे. अमेरिका-इस्राईल आणि इराण युद्ध लांबलं तर आयपीएलबाबत विचार करणं भाग पडणार आहे. त्याचा प्रभाव फक्त लीगवरच नाही तर इतर उद्योग धंदे, रुग्णालय आणि शैक्षणिक संस्थावरही बसण्याची शक्यता आहे.
युद्धाचा सर्वाधिक परिणाम हा पेट्रोलियम आणि एलपीजी उत्पादनाच्या पुरवठ्यावर झाला आहे. बंगळुरु आणि चेन्नई येथील हॉटेल व्यावसायिक संघटनानी सांगितलं की, त्यांच्याकडे फक्त एक दोन दिवस पुरेल इतकाच साठा आहे. एलपीजीचा वापर मर्यादित करण्यासाठी हॉटेल्सने त्यांचा मेन्यू मर्यादित करण्यास सुरूवात केली आहे. इतकंच काय तर युद्धामुळे खेळाडूंना मायदेशी जाणंही कठीण असल्याचं दिसून आलं आहे. विमानसेवेवरही परिणाम झाला आहे. टी20 वर्ल्डकप संपल्यानंतरही झिम्बाब्वे, वेस्ट इंडिज आणि दक्षिण अफ्रिका संघांना भारतातून तात्काळ निघता आलं नव्हतं.