टी20 वर्ल्डकप 2026 जेतेपदानंतर बीसीसीआयने खजाना केला खुला, 4 कामगिरींसाठी टीम इंडियाला 365 कोटी!
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत भारताने जबरदस्त कामगिरी केली. अंतिम सामन्यात न्यूझीलंडला पराभूत केलं आणि जेतेपदावर नाव कोरलं. यानंतर बीसीसीआयने टीम इंडियासाठी खजाना खुला केला. टीम इंडियाला 131 कोटींचं बक्षीस जाहीर केलं आहे.

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत भारतीय संघाने अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली. या स्पर्धेपूर्वीच भारत हा प्रबळ दावेदार मानला जात होता. पण स्पर्धेदरम्यान संघाची स्थिती पाहता क्रीडाप्रेमींच्या मनात जेतेपदाबाबत संशयाची पाल चुकचुकली होती. असं असताना टीम इंडियाने जेतेपद जिंकलं आणि किंतू परंतू सर्व काही दूर केलं. टीम इंडियाने टी20 वर्ल्डकप तिसऱ्यांदा आणि सलग दुसऱ्यांदा जिंकण्याची कामगिरी केली आहे. या कामगिरीनंतर बीसीसीआयने टीम इंडियावर पैशांचा वर्षाव केला आहे. बीसीसीआयने टीम इंडियाला 131 कोटी रूपयांचं बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. ही रक्कम खेळाडू, कोचिंग स्टाफ, सपोर्ट स्टाफ आणि इतर सदस्यांना वाटली जाईल. पण मागच्या वेळेपेक्षा यावेळी ही रक्कम 6 कोटींनी वाढवली आहे.मागच्या 21 महिन्यात बीसीसीआयने खेळाडूंना 365 कोटी रूपये बक्षीस दिलं आहे.
महिला वनडे वर्ल्डकप 2025
भारतात वुमन्स वनडे वर्ल्डकप 2025 स्पर्धा पार पडली होती. या स्पर्धेत भारतीय महिला संघांनी जबरदस्त कामगिरी केली आणि जेतेपदावर नाव कोरलं. अंतिम सामन्यात दक्षिण अफ्रिकेला पराभूत करून जेतेपद मिळवलं होतं. यानंतर बीसीसीआयने महिला संघाला 51 कोटी रुपयांचं बक्षीस दिलं होतं.
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेपूर्वी टीम इंडिया 2025 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळली होती. या स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडला धोबीपछाड दिला आणि जेतेपद मिळवलं. यानंतर बीसीसीआयने टीम इंडियाला 58 कोटींचं बक्षीस दिलं होतं.
टी20 वर्ल्डकप 2024
रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने 2024 मध्ये टी20 वर्ल्डकप जिंकला होता. यावेळी भारताने दक्षिण अफ्रिकेला पराभूत करून जेतेपद मिळवलं होतं. 2007 नंतर टीम इंडियाने जेतेपदावर नाव कोरलं होतं. या जेतेपदानंतर टीम इंडियाला बीसीसीआयने 125 कोटी रुपये दिले होते.
पुढचं लक्ष्य काय?
आतापर्यंत चार स्पर्धांमध्ये टीम इंडियाने जबरदस्त कामगिरी केली आहे. आता याच वर्षी वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धा होणार आहे. भारतीय महिला संघाने अद्याप या स्पर्धेत यश मिळवलेलं नाही. दुसरीकडे, पुढच्या वर्षी 2027 मध्ये वनडे वर्ल्डकप स्पर्धा होणार आहे. या दोन्ही स्पर्धांमध्ये भारतीय संघाने जेतेपद मिळवलं तर बीसीसीआय किती बक्षीस देते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
