IPL 2026 : 6,6,6,6,6,6, संजूचा झंझावात, मुंबई विरुद्ध चाबूक शतक, ठरला पहिलाच फलंदाज

Sanju Samson Century : संजू सॅमसन याने मुंबई इंडियन्सच्या होम ग्राउंडमध्ये जबरदस्त शतक झळकावलं. संजूने या शतकी खेळीसह खास यादीत स्थान मिळवलं आहे.

IPL 2026 : 6,6,6,6,6,6, संजूचा झंझावात, मुंबई विरुद्ध चाबूक शतक, ठरला पहिलाच फलंदाज
Sanju Samson Century
Image Credit source: IPL X Account
| Updated on: Apr 23, 2026 | 11:45 PM

टीम इंडियाचा स्टार आणि अनुभवी फलंदाज संजू सॅमसन याने आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेनंतर आयपीएलच्या 19 व्या मोसमातही तडाखा कायम ठेवला आहे. संजूने या 19 व्या मोसमातील 33 व्या सामन्यात होम टीम मुंबई इंडियन्स विरुद्ध वानखेडे स्टेडियममध्ये खणखणीत शतक झळकावलं आहे. संजूने शतक झळकावत चेन्नई सुपर किंग्सला 200 पार पोहचवलं. संजूच्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर चेन्नईने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 207 धावा केल्या. तसेच संजूने या शतकी खेळीसह खास कामगिरी करुन दाखवली आहे.

संजूने चेन्नईच्या डावातील शेवटच्या चेंडूवर चौकार ठोकत शतक पूर्ण केलं. संजूने 54 बॉलमध्ये 187.03 च्या स्ट्राईक रेटने नाबाद 101 धावांची खेळी केली. संजूने या 101 पैकी 76 धावा या चौकार आणि षटकारांच्या मदतीने केल्या. संजूने या खेळीत 10 चौकार आणि 6 षटकार लगावले. संजूच्या टी 20i कारकीर्दीतील हे आठवं तर आयपीएलमधील पाचवं शतक ठरलं.

संजू एकमेव फलंदाज

तसेच संजूचं हे या 19 व्या मोसमातील दुसरं शतक ठरलं. संजूने याआधी दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध शतक झळकावलं होतं. संजू यासह या मोसमात 2 शतकं झळकावणारा पहिला फलंदाज ठरला आहे. संजू व्यतिरिक्त या मोसमात मुंबई इंडियन्सच्या तिलक वर्मा आणि क्विंटन डी कॉक याने शतक झळकावलं आहे. तर सनरायजर्स हैदराबादच्या अभिषेक शर्मा यानेही शतक ठोकलं आहे.

संजू दुसराच भारतीय फलंदाज

तसेच संजू टी 20 क्रिकेटमध्ये 8 शतकं करणारा एकूण तिसरा फलंदाज ठरला आहे. टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक 9 शतकांचा विक्रम हा संयुक्तरित्या अभिषेक शर्मा आणि विराट कोहली या दोघांच्या नावावर आहे. अभिषेक वेगवान 9 टी 20 शतकं करणारा भारतीय फलंदाज आहे. अभिषेकने 184 डावांत 9 शतकं ठोकली आहेत. तर विराट कोहली याला 9 शतकांसाठी 403 डावात बॅटिंग करावी लागली आहे. तर संजूने 320 व्या डावात 8वं टी 20 शतक पूर्ण केलं.

मुंबईसमोर 208 धावांचं आव्हान

दरम्यान संजूने केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर चेन्नईने मुंबईसमोर 208 धावांचं आव्हान ठेवलं. संजूच्या नाबाद 101 धावांव्यतिरिक्त चेन्नईच्या इतर फलंदाजांना काही खास करता आलं नाही. चेन्नईसाठी कॅप्टन ऋतुराज गायकवाड आणि डेवाल्ड ब्रेव्हीस या दोघांव्यतिरिक्त इतर कुणालाही 20 पेक्षा जास्त धावा करता आल्या नाहीत. ऋतुराजने 22 तर डेवाल्डने 21 धावा जोडल्या. आता चेन्नई मुंबईला विजयापासून रोखणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us