MI vs RCB : महारविवार, 2 सख्ख्या भावांचा आमनासामना, मुंबई-आरसीबी मॅचमुळे अबोला संपणार?
Mumbai Indians vs Royal Challengers Bengaluru : आयपीएल स्पर्धेमुळे पुन्हा एकदा 2 सख्खे भाऊ एकमेकांविरुद्ध खेळताना दिसणार आहेत. हे दोघे कोण आहेत? जाणून घ्या.

क्रिकेट चाहत्यांना रविवारी 12 एप्रिलला वानखेडे स्टेडियममध्ये होणाऱ्या आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील 20 व्या सामन्याची प्रतिक्षा लागून राहिली आहे. या सामन्यात 2 चॅम्पियन्स संघ आमनेसामने असणार आहेत. गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु 5 वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्स विरुद्ध 2 हात करणार आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. या सामन्यानिमित्ताने 2 सख्खे भाऊ आमनेसामने असणार आहेत. या सामन्यानिमित्ताने 2 भावांमध्ये असलेला कथित अबोला संपणार की त्यात आणखी भर पडणार? याकडे चाहत्यांचं लक्ष लागून आहे. ते 2 सख्खे भाऊ कोण आहेत? तसेच दोघांमध्ये अबोला असल्याचं का म्हटलं जात आहे? हे जाणून घेऊयात.
हार्दिक विरुद्ध कृणाल
मुंबई विरुद्ध बंगळुरु सामन्यानिमित्ताने हार्दिक आणि कृणाल हे पंड्या बंधू एकमेकांविरुद्ध खेळताना दिसणार आहेत. हार्दिक आणि कृणाल दोघेही ऑलराउंडर आहेत. कृणाल आरसीबी तर पंड्या मुंबईचं प्रतिनिधित्व करत आहेत. हार्दिक मुंबईचा कॅप्टन आहे.
मुंबई विरुद्ध आरसीबी हा या स्पर्धेच्या हायव्होल्टेज सामन्यापैकी एक आहे. आतापर्यंत क्रिकेटमध्ये 2 सख्खे भाऊ एकत्र आणि एकमेकांविरुद्ध अनेकदा खेळले आहेत. मात्र मुंबई-आरसीबी सामना काही प्रमाणात खास असणार आहे. त्यामागील कारणही तसंच आहे. पंड्या बंधूंमध्ये गेल्या काही महिन्यांपासून कोल्ड वॉर सुरु असल्याचं म्हटलं जात आहे. दोन्ही भावांमध्ये अबोला असल्याची चर्चा सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.
नक्की खटकलंय कशावरुन?
टीम इंडियाने 8 मार्च रोजी न्यूझीलंडला पराभूत करुन तिसऱ्यांदा टी 20 वर्ल्ड कप जिंकण्याची कामगिरी केली. टीम इंडियाच्या या कामगिरीनंतर सू्र्यासेनेचं सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात आलं. हार्दिक या वर्ल्ड कप विजेत्या संघाचा सदस्य होता. मात्र त्यानंतरही कृणालने वर्ल्ड कप विजयावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. तसेच हार्दिकच्या वैयक्तिक आयुष्याचीही चर्चा पाहायला मिळाली. मात्र सोशल मीडियावरील या दाव्यांबाबत पंड्या बंधुपैकी कुणीही भाष्य केलेलं नाही. त्यामुळे या अशा चर्चांदरम्यान मुंबई-बंगळुरु यांच्यात होणाऱ्या सामन्यानिमित्ताने हार्दिक-कृणाल यांच्याकडे लक्ष असणार आहे.
हार्दिक-कृणालची कामगिरी
दरम्यान हार्दिकने 19 व्या मोसमात आतापर्यंत एकूण 2 सामन्यांमध्ये 27 धावा केल्या असून 1 विकेट मिळवली आहे. तर कृणालला 3 सामन्यांत बॅटिंगने काही खास करता आलेलं नाही. कृणालने अवघी 1 धाव केली आहे. मात्र कृणालने बॉलिंगने योगदान दिलं आहे. कृणालने 4 विकेट्स मिळवल्या आहेत.