Suryakumar Yadav : सूर्या काय लावलंय हे? स्टार फलंदाजाची मुंबई टी 20 लीग स्पर्धेतही अपयशी सुरुवात
Mumbai T20 League Suryakumar Yadav : सूर्यकुमार यादव याने भारतीय संघाला, मुंबई इंडियन्सला आणि स्थानिक क्रिकेट लीग स्पर्धेत टीमला एकहाती विजय मिळवून दिला आहे. मात्र आता सूर्या सातत्याने अपयशी ठरत आहे. सूर्याला मुंबई टी 20 लीग स्पर्धेत चाबूक सुरुवात करण्यात अपयश आलं.

टी 20i टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याला झालंय काय? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. सूर्याने टी 20i संघाचं नेतृत्व स्वीकारल्यापासून भारताने एकही मालिका गमावलेली नाही. तसेच सूर्याने कॅप्टन म्हणून पहिल्याच प्रयत्नात भारताला टी 20i वर्ल्ड कप जिंकून दिला. सूर्याची कर्णधार म्हणून कामगिरी सरस आहे. मात्र सूर्याला धावांसाठी प्रचंड संघर्ष करावा लागत आहे. सूर्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटनंतर आयपीएल आणि आता मुंबई टी 20 लीग स्पर्धेतही अपयशी ठरला आहे. सूर्याला एक एक धावेसाठी झगडावं लागत आहे. सूर्याला काही डावांचा अपवाद वगळता आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात काही खास करता आलं नाही. सूर्याने हीच हारकीरी मुंबई टी 20 लीग स्पर्धेत कायम ठेवली आहे. सूर्या या स्पर्धेत टीमच्या पहिल्याच सामन्यात अपयशी ठरला. सूर्या अवघ्या 19 धावा करुन माघारी परतला.
सूर्यकुमार यादव 19 धावांवर ढेर
सूर्या एमसीए आयोजित मुंबई टी20 लीग स्पर्धेत ट्रायम्फ नाइट्स मुंबई नॉर्थ ईस्ट संघाचं प्रतिनिधित्व करत आहे. सूर्या या मोहिमेतील आपल्या सामन्यात खेळताना 2 जून रोजी अपयशी ठरला. सूर्याला आश्वासक सुरुवात मिळाली. मात्र सूर्याला या खेळीला मोठ्या आकड्यात बदलता आलं नाही. अजिंक्य रहाणे याच्या नेतृत्वातील नॉर्थ मुंबई पँथर्सने ट्रायम्फ नाइट्स मुंबई नॉर्थ ईस्टसमोर 210 धावांचं आव्हान ठेवलं.
सूर्याला या सामन्यात मोठी खेळी करुन संघाला विजयी करण्याची संधी ही. मात्र सूर्याने निराशा केली. सूर्याने 11 चेंडूत 19 धावा केल्या. सूर्याने या खेळीतील 19 पैकी 14 धावा या चौकारांच्या मदतीने केल्या. सूर्याने 4 चौकार लगावले. राहुल सावंत याने सूर्याला आऊट केलं. सूर्याच्या रुपात टीमने तिसरी विकेट गमावली.
सूर्याचं भारतीय संघाचं कर्णधारपद जाणार?
सूर्यकुमार यादव धावा करण्याबाबत सातत्याने अपयशी ठरत असल्याने त्याचं भारतीय टी 20i संघाचं कर्णधारपद जाणार असल्याची चर्चा क्रिकेट वर्तुळात पाहायला मिळत आहे. सूर्या गेल्या 2 वर्षांपासून धावा करण्यात अपयशी ठरत आहे. सूर्याला आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातही काही खास करता आलं नाही. सूर्याने 13 डावांत 2 अर्धशतकाच्या मदतीने एकूण 270 धावा केल्या. त्यामुळे बीसीसीआय निवड समिती आगामी मालिकेसाठी सूर्याबद्दल काय निर्णय घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. टीम इंडिया आगामी टी 20i मालिकेत जून महिन्यात आयर्लंड विरुद्ध 2 हात करणार आहे. उभयसंघात एकूण 2 सामने खेळवण्यात येणार आहेत.