IND vs BAN : “अर्धशतकं आणि शतकांची गरज नाही..”, बांगलादेशला पराभूत केल्यानंतर रोहित शर्माने स्पष्टच सांगितलं

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील महत्त्वाच्या सामन्यात भारताने अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली. बांगलादेशला 50 धावांनी पराभूत करून उपांत्य फेरीतील स्थान पक्कं केलं आहे. सुपर 8 फेरीतील दुसरा सामना भारताने जिंकला असून शेवटचा सामना ऑस्ट्रेलियाशी आहे. बांगलादेशला पराभूत केल्यानंतर रोहित शर्माने आपलं मन मोकळं केलं.

IND vs BAN : अर्धशतकं आणि शतकांची गरज नाही.., बांगलादेशला पराभूत केल्यानंतर रोहित शर्माने स्पष्टच सांगितलं
Image Credit source: BCCI
| Updated on: Jun 23, 2024 | 12:12 AM

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील सुपर 8 फेरीतील दुसरा सामना भारत आणि बांग्लादेश यांच्यात रंगला. या सामन्यात भारताने मजबूत पकड मिळवली होती. बांगलादेशला डोकंच वर काढू दिलं नाही. प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 षटकात 5 गडी गमवून 196 धावा केल्या आणि विजयासाठी 197 दिल्या. बांगलादेशला 20 षटकात 8 गडी गमवून 146 धावा करता आल्या. भारताने बांगलादेशवर 50 धावांनी विजय मिळवला. या विजयासह भारताने आपला उपांत्य फेरीतील दावा मजबूत केला आहे. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्याने जबरदस्त कामगिरी केली. अष्टपैलू कामगिरी करून भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. हार्दिक पांड्याला त्याच्या या कामगिरीसाठी सामनावीराच्या पुरस्काराने गौरविण्यात आलं. कर्णधार रोहित शर्माने हार्दिक पांड्याच्या या खेळीचं कौतुक केलं. तसेच सांघिक कामगिरीबाबत एक मोठी गोष्ट सांगून गेला.

“आम्ही बॅटिंग आणि बॉलिंगमध्ये जबरदस्त कामगिरी केली. आठही फलंदाजांनी आपली भूमिका बजावणं खूपच महत्त्वाचं आहे. मग ते काही असो. आमच्यातील एकाने अर्धशतकी खेळी केली आणि 197 धावा आल्या. टी20 क्रिकेटमध्ये अर्धशतकं आणि शतकांची गरज नाही. तुम्ही गोलंदाजांवर कसा दबाव टाकता हे महत्त्वाचं आहे. असेच आमचे फलंदाज खेळले आणि तसंच आम्हाला खेळायचं आहे. संघात भरपूर अनुभव असून आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत.”, असं रोहित शर्मा सामन्यानंतर म्हणाला.

“मी मागच्या सामन्यातही म्हणालो होतो की हार्दिक फलंदाजी करून संघाला चांगल्या स्थितीत आणतो. वरचे पाच सहा फलंदाज चांगले खेळले की तो त्याच्या पद्धतीने बरोबर सामना संपवतो. हार्दिक हा हार्दिक आहे. त्याच्यात काय क्षमता आहे हे आम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळेच आमच्यासाठी एक महत्त्वाचा खेळाडू आहे. त्याची कामगिरी अशीच राहिली तर आम्ही नक्कीच चांगल्या पोझिशनमध्ये येऊ.”, असंही रोहित शर्मा पुढे म्हणाला.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

बांग्लादेश (प्लेइंग इलेव्हन): तनझिद हसन, लिटन दास (विकेटकीपर), नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), तौहीद ह्रदोय, शकीब अल हसन, महमुदुल्ला, जाकेर अली, रिशाद हुसेन, महेदी हसन, तनझिम हसन साकिब, मुस्तफिजुर रहमान.

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह