
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतातील 20 पेक्षा अधिक निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यात कुणी आपली आई गमावली, कुणी आपले वडील गमावले. तर कुणाला पोटच्या मुलाला आणि नवऱ्याला गमवावं लागलं. रोजच्या धकाधकीतून जीवनातून काही दिवस मौजमजा करायला गेलेल्या या नागरिकांचा पहलगाममध्ये पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांकडून करण्यात आलेल्या हल्ल्यात मृत्यू झाला. या हल्ल्याला काही महिने झाले नाहीत तेव्हाच टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान या दोन्ही देशांचे संघ आशिया कप स्पर्धेत आमनेसामने असणार आहेत. त्यामुळे या सामन्याला विरोध केला जात आहे.
या हल्ल्यानंतरही सामना होत असल्याने सर्वच स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. दहशतवादी हल्ल्यात आपल्या स्वकीयांना गमावलेल्यांनी भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याच्या आयोजनावरुन नाराजी व्यक्त करत थेट केंद्र सरकारलाच प्रश्न केले आहेत.
माझ्या भावाने अंगावर गोळ्या झेलल्या, त्या परत करा आणि मग भारत पाकिस्तान सामना खेळवा, अशी प्रतिक्रिया पहलगाम हल्ल्यात आपल्या भावाला आणि वडिलांना गमावणाऱ्या जामनगरमधील सावन परमार यांनी दिली. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात यतिम परमार आणि सुमीत परमार या बाप-लेकाचा मृत्यू झाला होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रश्न
#WATCH | Bhavnagar, Gujarat: On the India vs. Pakistan match in the Asia Cup 2025 to be held today, Kiran Yatish Parmar, who lost her husband and son in the Pahalgam terror attack, says, “… This match should not happen. I want to ask Prime Minister Modi, Operation Sindoor has… pic.twitter.com/LMuFUc2LN9
— ANI (@ANI) September 14, 2025
तसेच या हल्ल्यात पती आणि मुलाला गमावणाऱ्या किरण परमार यांनी भारत-पाकिस्तान सामन्याचा विरोध केला आणि थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच प्रश्न विचारला.
“हा सामना (भारत विरुद्ध पाक) व्हायला नको. मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रश्न विचाराचाय की ऑपरेशन सिंदूर संपलं नसेल मग भारत-पाकिस्तान सामना का होतोय?”, असा प्रश्न किरण परमार यांनी केला. तसेच किरण यांनी देशवासियांना आवाहन केलं.
“पहलगाम दहशतवादी हल्ल्यात ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावलं त्यांच्या कुटुंबियांना भेटा. ते कुटुंबिय किती दुःखी आहेत हे बघा. आमच्या जखमा अजूनही भरलेल्या नाहीत, असं आवाहन करत किरण परमार यांनी आपलं दु:ख व्यक्त केलं.
दरम्यान या सामन्यामुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं आहे. इतक्या मोठ्या दहशतवादी हल्ल्यानतंरही केंद्र सरकारने भारत-पाकिस्तान सामन्याला परवानगी कशी दिली? असा सवाल विरोधकांकडून केला जात आहे. सरकारला शहीदांच्या रक्ताची किंमत नाही का? असा प्रश्नही विरोधकांनी या निमित्ताने उपस्थित केला.