IND vs SL : श्रीलंकेचा डाव 284 धावांवर आटोपला, पहिल्या डावात भारताकडे 178 धावांची आघाडी
भारत आणि श्रीलंका यांच्यात पहिला कसोटी सामना सुरू आहे. या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात भारताने 178 धावांची आघाडी घेतली आहे. त्यामुळे दुसऱ्या डावात काय निकाल लागेल याची उत्सुकता वाढली आहे.

भारत आणि श्रीलंका यांच्यात पहिला कसोटी सामना गॉल आंतरराष्ट्रीय मैदानात सुरू आहे. या सामन्यात वारंवार पावसाचा व्यत्यय आला, तरी हा सामना निर्णायक ठरू शकतो अशा स्थितीत आहे. कारण तिसऱ्या दिवसाचा खेळ संपण्याच्या एक तासाआधीच श्रीलंकेचा डाव आटोपला. भारताने पहिल्या डावात सर्व गडी गमवून 462 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेडने 284 धावांपर्यंत मजल मारली. त्यामुळे भारताकडे 178 धावांची आघाडी आहे. या आघाडीसह भारतीय संघ दुसर्या डावात खेळणार आहे. खेळपट्टी फिरकीला मदत करणारी आहे. त्यामुळे दुसऱ्या डावात भारताने अतिरिक्त 200 धावा केल्या तरी सामना भारताच्या पारड्यात झुकण्याची शक्यता आहे. कारण ही खेळपट्टी पूर्णपणे फिरकीला मदत करणारी आहे. भारताला श्रीलंकेच्या 8 विकेट या फिरकीच्या जोरावर मिळाल्या आहे. तर फक्त दोनच विकेट वेगवान गोलंदाजांच्या खात्यात गेल्या आहेत.
श्रीलंकेच्या डावाची सुरूवात काही खास झाली नाही. आघाडीचे पाच फलंदाज झटपट बाद झाले. 90 धावांवर 5 गडी तंबूत होते, त्यामुळे दबाव वाढला होता. पण सहाव्या विकेटसाठी सोनल दिनुषा आणि निरोशन डिकवेला यांनी 146 धावांची निर्णायक भागीदारी केली. केएल राहुलने झेल सोडल्यानंतर निरोशनने त्याचा पुरेपूर फायदा घेतला. या दोघांच्या खेळीमुळे श्रीलंकन संघ सुस्थितीत आला. निरोशनन डिकवेला याने 115 चेंडूत 80 धावा केल्या. तर सोनल डिनुषा याने 168 चेंडूंचा सामना केला आणि 100 धावांची खेली केली. या दोघांव्यतिरिक्त एकही फलंदाज मोठी धावसंख्या करू शकलं नाही. या दोघांची भागीदारी झाली नसती तर कदाचित श्रीलंकेला फॉलोऑन मिळाला असता आणि भारताच्या विजयाच्या आशा आणखी वाढल्या असत्या.
भारताकडून फिरकीपटू मानव सुथारने चमकदार कामगिरी केली. त्याने 21.4 षटकं टाकली आणि 76 धावा देत 4 विकेट काढल्या. त्या खालोखाल रवींद्र जडेजाने 21 षटकं टाकत 3 गडी बाद केले. तर मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि कुलदीप यादवच्या खात्यात प्रत्येकी एक विकेट गेली. दरम्यान, पावसाच्या व्यत्ययामुळे पुन्हा एकदा खेळ थांबवण्याची वेळ आली आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला असं जाहीर करण्यात आलं असून उर्वरित दोन दिवस निर्णायक ठरणार आहेत.
