
रोहित शर्मा याने त्याच्या नेतृत्वात भारताला 2007 नंतर 2024 मध्ये टी 20i वर्ल्ड कप जिंकून दिला. रोहितने या ऐतिहासिक विजयानंतर टी 20i क्रिकेटला अलविदा केला. रोहितने भारतासाठी टी 20 फॉर्मेटमध्ये अप्रतिम, अविस्मरणीय आणि ऐतिहासिक कामगिरी केली. रोहितने भारताला अनेकदा एकहाती सामने जिंकून दिले. मात्र 2024 च्या टी 20 वर्ल्ड कप विजयानंतर रोहित पर्वाचा शेवट झाला. रोहितला निवृत्त होऊन आता वर्षभरापेक्षा जास्त कालावधी झाला आहे. मात्र त्यानंतरही रोहितचा टी 20i मधील दबदबा कायम आहे. पाकिस्तानचा अनुभवी फलंदाज बाबर आझम याच्याकडे रोहितला मागे टाकण्यासाठी 10 पेक्षा कमी धावांचीच गरज आहे. मात्र बाबरला रोहितचा हा विक्रम मोडीत काढणं जवळपास अवघड आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यामागे नक्की कारण काय? हे देखील जाणून घेऊयात.
टी 20i मध्ये सर्वाधिक धावांचा वर्ल्ड रेकॉर्ड रोहित शर्माच्या नावावर आहे. मात्र बाबर हा वर्ल्ड रेकॉर्डपासून ब्रेक करण्यापासून फक्त 9 धावांनी दूर आहे. बाबरला या 9 धावा करण्यासाठी संधी मिळेल का? हा मोठा प्रश्न आहे.
रोहितने टी 20i कारकीर्दीतील 140 सामन्यांमध्ये 32.05 च्या सरासरीने आणि 140.89 या स्ट्राईक रेटने 4 हजार 231 धावा केल्या आहेत. रोहितने या दरम्यान 5 शतकं आणि 32 अर्धशतकं झळकावली आहेत. तसेच रोहितचा टी 20i मधील नॉट आऊट 121 हा हायस्कोअर आहे.
तसेच टी 20i मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत बाबर आझम दुसऱ्या स्थानी आहे. बाबरने 128 सामन्यांमध्ये 39.83 च्या सरासरीने आणि 129.22 च्या स्ट्राईक रेटने 4 हजार 223 धावा केल्या आहेत. रोहित आणि बाबर यांच्यात फक्त 9 धावांचाच फरक आहे. तर या यादीत विराट कोहली तिसर्या स्थानी आहे. विराटनेही रोहितसोबत टी 20i मधून निवृत्त घेतली होती. विराटने टी 20i कारकीर्दीतील 125 सामन्यांमध्ये 4 हजार 188 धावा केल्या आहेत.
आता 9 धावा करणं फार अवघड नाही. मात्र ते बाबरसाठी अवघड असल्याची स्थिती आहे. बाबरने टी 20i संघातील त्याचं स्थान जवळपास गमावल्यात जमा आहे. बाबरकडे आशिया कप 2025 स्पर्धेत रोहितला मागे टाकण्याची संधी होती. मात्र पीसीबीने बाबरला डच्चू दिला. पीसीबीने 17 ऑगस्टला आशिया कप स्पर्धेसाठी संघाची घोषणा केली. मात्र निवड समितीने बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान या दोघांना डच्चू दिला. त्यामुळे पीसीबीने एका अर्थाने बाबरला रोहितचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक करण्यापासून रोखलं, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
बाबरने अखेरचा टी 20i सामना हा डिसेंबर 2024 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता. बाबरला त्यानंतर टी 20i संघात स्थान मिळालं नाही.
आशिया कप स्पर्धेतनंतर आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026कडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष आहे. मात्र बाबरला या स्पर्धेतह संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. त्याचं कारणही तसंच आहे.
बाबरला स्ट्राईक रेटमध्ये सुधार करण्याची गरज आहे, असं पाकिस्तान हेड कोच (वनडे आणि टी20i) माईक हेसन यांनी म्हटलंय. तसेच बाबरला फिरकी गोलंदाजांविरुद्ध आक्रमक शॉट्स खेळावे लागतील, असंही हेसन यांनी म्हटलं. त्यामुळे आता बाबरला भविष्यात टी 20i संघात केव्हा संधी मिळणार? हा मोठा प्रश्न आहे.