
सूर्यकुमार यादव याने केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने आयपीएल 2025 मधील साखळी फेरीतील आपल्या शेवटच्या सामन्यात पंजाब किंग्ससमोर 185 धावांचं आव्हान ठेवलं आहे. मुंबईने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 184 धावा केल्या. मुंबईकडून सूर्यकुमार व्यतिरिक्त रोहित शर्मा, रायन रिकेल्टन, विल जक्स आणि कॅप्टन हार्दिक पंड्या याांना चांगली सुरुवात मिळाली. मात्र त्यांना मोठी खेळी करता आली नाही. त्यामुळे सू्र्याच्या अर्धशतकी खेळीनंतरही मुंबई 200 धावांपर्यंत पोहचू शकली नाही. त्यामुळे आता मुंबईचे गोलंदाज कशी बॉलिंग करतात? याकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे.तसेच दोन्ही संघांसाठी क्वालिफायर 1 च्या हिशोबाने हा सामना महत्त्वाचा आहे. त्यामुळे हा सामना आता कोण जिंकतं? याची क्रिकेट चाहत्यांना प्रतिक्षा आहे.
टॉस गमावून बॅटिंगसाठी आलेल्या रोहित शर्मा आणि रायन रिकेल्टन या सलामी जोडीने संयमी सुरुवात केली. या दोघांनी 45 धावांची भागीदारी केली. रायन रिकेल्टन 27 रन्स करुन माघारी परतला. रायनने 20 बॉलमध्ये 5 फोरसह या धावा केल्या. त्यानंतर रोहित आणि सूर्या या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 36 धावा जोडल्या. रोहित पूर्णपणे सेट झाला होता. मात्र रोहित मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. रोहित 21 बॉलमध्ये 24 रन्स करुन आऊट झाला. रोहितने या खेळीत 1 सिक्स आणि 2 फोर ठोकले. तिलक वर्मा याने पुन्हा निराशा केली. तिलक 1 धाव करुन माघारी परतला. मात्र सूर्यकुमार एक बाजू लावून होता.
सूर्यकुमार एका बाजूने धावा करत होता. तर दुसऱ्या बाजूने मुंबई विकेट टाकत होती. तिलकनंतर विल जॅक्स आऊट झाला. विलने 17 रन्स करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. त्यानंतर कॅप्टन हार्दिक पंड्या मैदानात आला. सूर्या आणि हार्दिक या दोघांनी काही वेळ भागीदारी केली. हार्दिकला चांगली सुरुवात मिळाली. मात्र हार्दिक निर्णायक क्षणी आऊट झाला. मार्को यान्सेन याने ही जोडी फोडली. सूर्या आणि हार्दिकने पाचव्या विकेटसाठी 46 रन्स जोडल्या. हार्दिक 15 बॉलमध्ये 26 रन्स करुन माघारी परतला.
त्यानंतर गेल्या सामन्यात दिल्ली विरुद्ध चाबूक खेळी करणारा नमन धीर मैदानात आला. नमनने दिल्ली प्रमाणेच या सामन्यात सुरुवात केली. नमनने 2 गगनचुंबी षटकार लगावले. त्यामुळे मुंबई आता सहज 200 पोहचेल असं वाटत होतं. तेव्हात नमन 20 रन्स करुन बाद झाला. नमननंतर डावातील शेवटच्या बॉलवर सूर्यकुमार यादव यादवही आऊट झाला. पंजाबच्या गोलंदाजांनी अशाप्रकारे ठराविक अंतराने झटके देत मुंबईला 200 धावांच्या आधीच रोखण्यात यश मिळवलं. सूर्यकुमार यादव याने 39 बॉलमध्ये 2 सिक्स आणि 6 फोरसह 57 रन्स केल्या. तर नमन धीर 1 धाव करुन नाबाद परतला. पंजाबकडून अर्शदीप सिंह, मार्को यान्सेन आणि विजयकुमार वैशाख या तिघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. तर हरप्रीत ब्रार याने 1 विकेट घेतली.