RR vs MI : कर्णधार रियान पराग पराभवानंतर सूर्यकुमार आणि हार्दिकचं नाव घेत असं काय म्हणाला?

Riyan Parag On Hardik Pandya and Suryakumar Yadav : मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सला त्यांच्याच घरात 100 धावांनी पराभूत केलं. राजस्थानच्या या लाजीरवाण्या पराभवानंतर कर्णधार रियान पराग याने सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्याबाबत काय म्हटलं? जाणून घ्या.

RR vs MI : कर्णधार रियान पराग पराभवानंतर सूर्यकुमार आणि हार्दिकचं नाव घेत असं काय म्हणाला?
Riyan Parag Post Match RR vs MI IPL 2025
Image Credit source: Social Media
| Updated on: May 02, 2025 | 2:29 AM

वैभव सूर्यवंशी याच्या शतकी खेळीच्या जोरावर गुजरात टायटन्स विरुद्ध दणदणीत विजय मिळवल्यानंतर काही तासांनी अशी वेळ ओढावेळ, राजस्थान रॉयल्सने असा स्वप्नातही विचार केला नसेल. मुंबई इंडियन्सने गुरुवारी 1 मे रोजी राजस्थानवर जयपूरमधील सवाई मानसिंह स्टेडियममध्ये 100 धावांनी धमाकेदार विजय मिळवला. मुंबईने विजयासाठी दिलेल्या 218 धावांचा पाठलाग करताना राजस्थानला पूर्ण 20 ओव्हरही खेळता आलं नाही. मुंबईने राजस्थानला 16.1 ओव्हरमध्ये 117 धावांवर गुंडाळलं. मुंबईने यासह आयपीएलच्या 18 व्या मोसमात सलग सहावा तर एकूण सातवा विजय मिळवत पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी झेप घेतली. तसेच मुंबईने जयपूरमध्ये तब्बल 13 वर्षांनंतर विजय मिळवला.

तर दुसऱ्या बाजूला राजस्थान रॉयल्सचा हा या मोसमातील 11 सामन्यांमधील आठवा पराभव ठरला. राजस्थान या पराभवासह प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडणारी दुसरी टीम ठरली. राजस्थानचा हा पराभव कर्णधार रियान परागला जिव्हारी लागला. रियानने सामन्यानंतर काय म्हटलं? हे जाणून घेऊयात.

रियान पराग काय म्हणाला?

“मुंबईने ज्या पद्धतीने बॅटिंग केली त्याचं श्रेय त्यांना द्यावं लागेल. मुंबईने सुरुवातीला रनरेट कायम ठेवला. त्यांनी प्रत्येक ओव्हरमध्ये 10 च्या सरासरीने धावा केल्या आणि अखेरीस फटकेबाजी केली. आमच्या बॅटिंगबाबत बोलायचं झालं तर, आज आमचा दिवस नव्हता. 190-200 धावांचं आव्हान हे आदर्श असतं, मात्र हार्दिक पंड्या आणि सूर्या भाऊने शेवटी गिअर बदलला. आम्ही काही गोष्टी चांगल्या करु शकलो असतो.मात्र तसं झालं नाही, त्यामुळे जे झालंय ते स्वीकारावं लागेल”, असं रियानने म्हटलं आणि सूर्या-हार्दिकच्या खेळीचं कौतुक केलं.

राजस्थानने टॉस जिंकून मुंबईला बॅटिंगसाठी भाग पाडलं. रोहित शर्मा आणि रायन रिकेल्टन या दोघांनी 116 धावांची सलामी भागीदारी केली. रोहित आणि रायनने या दरम्यान वैयक्तिक अर्धशतकं झळकावली. सलामी जोडी बाद झाल्यानंतर सूर्यकुमार आणि हार्दिक या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 94 धावांची नाबाद भागीदारी केली. सूर्या आणि हार्दिक या दोघांनी सेम टु सेम धावा केल्या. दोघांनी प्रत्येकी 23 चेंडूत नाबाद 48 धावा केल्या.

रियान राजस्थानच्या बॅटिंगबाबत काय म्हणाला?

“आम्ही चांगली सुरुवात करतोय. मात्र पावरप्लेमध्ये विकेट गेल्यानंतर मधल्या फळीत मला आणि ध्रुव जुरेलला जबाबदारी घ्यावी लागेल. आम्ही स्वत:वर विश्वास ठेवतो. भविष्यात पुन्हा अशी स्थिती उद्भवली तर आम्ही सामना करण्यासाठी तयार आहोत”,असा विश्वास रियानने व्यक्त केला.