RCB vs GT, Qualifier 1: नाणेफेकीचा कौल गमावताच आरसीबीचा पराभव? गुजरात टायटन्सला असा फायदा
IPL 2026 Qualifier 1: आयपीएल 2026 स्पर्धेतील क्वॉलिफायर 1 सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात होत आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल गुजरात टायटन्सच्या बाजूने लागला. यासह गुजरात टायटन्सच्या विजयाची शक्यता वाढली आहे. कसं आणि का ते जाणून घ्या.

आयपीएल 2026 स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात लढत होत आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा गुजरातने जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे गुजरात टायटन्सच्या विजयाची शक्यता वाढली आहे. आयपीएल स्पर्धेत गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू याचं्यात एकूण 8 सामने खेळले गेले आहे. प्रत्येकवेळी धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाला यश मिळालं. आयपीएल 2022, 2023, 2024, 2025 आणि 2026 मध्येही असंच घडलं आहे. पण धर्मशाळेतील मैदानाचं गणित काही वेगळं आहे. येथे पहिल्यांदा फलंदाजी करणारा संघही जिंकू शकतो. पहिल्या डावात 210 धावांपेक्षा जास्त धावा केल्या तर त्या गाठणं कठीण जातं. धर्मशाळेतील या मैदानात 2023 नंतर आतापर्यंत 6 नाईट सामने खेळले गेले. यात पहिल्यांदा फलंदाजी करणारा संघ 3 वेळा आणि धावांचा पाठलाग करणारा संघ तीन वेळा जिंकला आहे. प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 210 पेक्षा जास्त धावा केल्या तर विजय मिळाला आहे हे महत्त्वाचं आहे.
नाणेफेकीचा कौल झाल्यानंतर गुजरात टायटन्सचा कर्णधार शुबमन गिल म्हणाला की, ‘आम्ही प्रथम गोलंदाजी करणार आहोत. खेळपट्टी चांगली दिसतेय, पण आपण पाहिलंय आणि विशेषतः या मैदानावर, दुसऱ्या डावात थोडं दव पडतं, त्यामुळे धावांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करणं नेहमीच चांगलं असतं. मला वाटतं, हा सामना पूर्णपणे खेळातील समीकरणे काढून टाकण्याबद्दल आहे. आम्ही खूप चांगला क्रिकेट खेळत आहोत आणि आशा आहे की आम्ही ते पुढेही चालू ठेवू. मी 14 वर्षांखालील आणि 16 वर्षांखालील काळात इथे खूप खेळलो आहे. मी इथे बराच वेळ घालवला आहे, त्यामुळे हो, आशा आहे की याचा आम्हाला चांगला उपयोग होईल. आणि हो, हे जगातील सर्वात सुंदर मैदानांपैकी एक आहे. आमच्या संघात एक बदल आहे. अर्शद खानच्या जागी कुलवंत संघात आला आहे.’
आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदार म्हणाला की, ‘खरं सांगायचं तर, मला वाटतं खेळपट्टी खूप चांगली दिसतेय. ती बरीच कठीण आहे. चेंडू बॅटवर चांगला येईल, त्यामुळे मला वाटतं की 40 षटकांत त्यात काही बदल होणार नाही. म्हणून आम्ही एक चांगली धावसंख्या उभारण्याचा आणि त्यांच्यावर दबाव ठेवण्याचा प्रयत्न करू. मला वाटतं की हा सामना जिंकल्यानंतर थेट अंतिम फेरीत जाण्यासाठी पहिला क्वालिफायर सामना एक चांगला पर्याय आहे, पण आम्ही सध्या एका वेळी एकाच सामन्यावर लक्ष केंद्रित करत आहोत. आम्ही या सामन्यात आमचं सर्वोत्तम देऊ. मला वाटतं की आम्ही चांगला क्रिकेट खेळलो आहोत आणि आम्ही प्रतिस्पर्ध्यांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी आमच्या ताकदीवर अधिक लक्ष केंद्रित करत आहोत.’