
टीव्ही 9 भारतवर्षच्या सत्ता सम्मेलन या विशेष कार्यक्रमात विविध क्षेत्रातील दिग्गजांनी हजेरी लावली. तसेच या कार्यक्रमाला भारतीय क्रिकेट वर्तुळातील आजी माजी खेळाडूंनीही उपस्थिती लावली. ऑलराउंडर अक्षर पटेल आणि वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह या दोघांनी या कार्यक्रमात अनेक गोष्टींवर भाष्य केलं. तसेच टीम इंडियाला लढायला आणि भिडायला शिकवणारा दादा म्हणजेच माजी कर्णधार सौरव गांगुली याने देखील सत्ता सम्मेलन या कार्यक्रमात क्रिकेटमधील अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. तसेच दादाने या कार्यक्रमात अपवाद वगळता क्रिकेट चाहत्यांनाही माहित नसलेल्या गोष्टीही सांगितल्या. गांगुलीने नक्की काय काय सांगितलं याबाबत जाणून घेऊयात.
गांगुलीला या कार्यक्रमादरम्यान सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली या दोघांपैकी सर्वोत्तम कोण? असा प्रश्न करण्यात आला. गांगुलीने या फिरकी प्रश्नावर हुशारीने उत्तर दिलं. गांगुलीने या प्रश्नाचं उत्तर मी देऊ शकत नाही, असं म्हटलं. मात्र दादाने सचिनबाबत भरभरुन भाष्य केलं.
“मी त्याच्यासोबत फार क्रिकेट खेळलोय. माझ्या नजरेत तो फार मोठा क्रिकेटर आहे. सचिनने 100 शतकं झळकावणं फार मोठी कामगिरी आहे. पुन्हा तशी कामगिरी करणं कदाचित अवघड आहे” असं गांगुली म्हणाला. तसेच दादाने सचिनसोबत खेळताना त्याच्यावर दबाव असायचा असं म्हटलं. “सचिनसोबत ओपनिंग करताना माझ्यावर चांगल्या दर्जाचं खेळ करण्याचा दबाव असायचा”, असं गांगुलीने म्हटलं.
“विराट आणि सचिन या दोघांपैकी चांगलं कोण आहे? हे मला विचारु नका. दोघांनी असंख्य सामन्यांमध्ये विजयी केलं आहे. दोघांनी खोऱ्याने धावा केल्यात, इतकी शतकं झळकावणं फार अवघड आहे”, असं माजी कर्णधाराने यावेळेस म्हटलं.
“मी त्याच्यासोबत (सचिन) 250 एकदिवसीय सामन्यांत सलामीला खेळलो आहे. माझ्या कामगिरीत उतार येता कामा नये, असं मी बोलायचो. तर माझी बायको बोलायची की उतार तर येणार. मात्र मी म्हणायचो की लोकं बोलतील की एका बाजूला इतका मोठा फलंदाज आहे, तर दुसऱ्या बाजूला नवशिक्या खेळत आहे”, असं गांगुली याने सांगितलं.
दरम्यान सचिनने 200 कसोटी, 463 एकदिवसीय आणि 1 टी 20i सामन्यात भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. सचिनने या तिन्ही फॉर्मेटमध्ये 15921, 18426 आणि 10 अशा धावा केल्या आहेत.
तर विराटने 123 कसोटी सामन्यांत 9 हजार 230 धावा केल्यात. तसेच 125 टी सामन्यांमध्ये विराटच्या नावावर 4 हजार 188 धावांची नोंद आहे. विराट टी 20i आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे.तर विराट फक्त एकदिवसीय क्रिकेटमध्ये सक्रीय आहे. विराटने वनडेत आतापर्यंत 311 मॅचेसमध्ये 14 हजार 797 धावा केल्या आहेत.