IND vs PAK: अभिषेक शर्मापेक्षा संजू सॅमसन बरा, शून्यावर बाद होताच सोशल मीडियावर जुंपली

पाकिस्तानविरुद्धच्या हायव्होल्टेज सामन्यात भारताला अभिषेक शर्माच्या रुपाने पहिला धक्का बसला. त्याची विकेट जाणं हे काही चर्चेचा विषय नाही. पण सलग दुसऱ्यांदा त्याला खातं खोलता आलं नाही. त्यामुळे नकोशा पंगतीत बसला आहे.

IND vs PAK: अभिषेक शर्मापेक्षा संजू सॅमसन बरा, शून्यावर बाद होताच सोशल मीडियावर जुंपली
IND vs PAK: अभिषेक शर्मापेक्षा संजू सॅमसन बरा, शून्यावर बाद होताच सोशल मीडियावर जुंपली
Image Credit source: PTI
| Updated on: Feb 15, 2026 | 7:30 PM

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील हायव्होल्टेज सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात होत आहे. या सामन्यात कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेकीचा कौल गमावला आणि प्रथम फलंदाजी वाटेला आली. खरं तर हा निर्णय त्याच्या मनासारखा झाला. असं त्याने नाणेफेकीनंतर सांगितलं. नाणेफेक जिंकली असती तर प्रथम फलंदाजीच केली असती असं कर्णधार सूर्यकुमार यादव म्हणाला. यासह त्याने संघात दोन बदल असल्याचं सांगितलं. अर्शदीप सिंह आणि संजू सॅमसनला आराम दिल्याचं सांगितलं. तसेच अभिषेक शर्मा आणि फिरकीपटू संजू सॅमसन याला संधी दिली गेली. या सामन्यात अभिषेक शर्माकडून फार अपेक्षा होत्या. पण भारतीय क्रीडाप्रेमींचा अपेक्षाभंग झाला. कारण त्याला खातही खोलता आलं नाही. अभिषेक शर्मा आजारी होता आणि रुग्णालयातून नामिबियाविरुद्धच्या सामन्यापूर्वी डिस्चार्ज मिळाला होता. त्यामुळे त्या सामन्यात खेळला नाही. पण आता फिट असून या सामन्यात चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. पण पुन्हा निराशा पदरी पडली.

पाकिस्तानकडून पहिलं षटक टाकण्यासाठी सलमान आगा मैदानात आला होता. तर सामना करण्यासाठी इशान किशन समोर उभा होता. पहिला चेंडू निर्धाव गेला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर धाव घेतली आणि अभिषेकला स्ट्राईक दिली. यानंतर त्याने सलग तीन चेंडू निर्धाव घालवले. तसेच शेवटच्या चेंडूवर प्रहार करताना झेल देऊन बाद झाला. त्याने 4 चेंडूंचा सामना केला आणि त्याला खातंही खोलता आलं नाही. या स्पर्धेत सलग दुसऱ्यांदा शून्यावर बाद झाला. त्यामुळे सोशल मीडियावर याच्यापेक्षा संजू सॅमसन बरा अशी चर्चा रंगली आहे. कारण संजू सॅमसनने मागच्या सामन्यात 22 धावांची खेळी केली होती. पण त्याला या सामन्यात संधी दिली नाही.

अभिषेक शर्मा पहिल्या सामन्यात गोल्डन डकवर बाद झाला होता. अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात पहिल्याच चेंडूवर तंबूत परतला होता. यासह टी20 वर्ल्डकप स्पर्धेत अभिषेक शर्मा नकोशा यादीत जाऊन बसला. पहिल्या दोन सामन्यात सलग शून्यावर बाद होणार तिसरा फलंदाज ठरला आहे. आषिश नेहरा आणि इम्रुल कायस हे दोघं टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील पहिल्या दोन सामन्यात शून्यावर बाद झाले होते. आता या यादीत अभिषेक शर्मा बसला आहे.