IPL 2026, MI vs DC : दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध पराभव झाल्यानंतर सूर्यकुमारने यादवने असं फोडलं खापर
आयपीएल 2026 स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्सला पराभवाचं तोंड पाहावं लागलं. दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सला 6 गडी आणि 11 चेंडू राखून पराभूत केलं. या पराभवानंतर मुंबई इंडियन्सचा तात्पुरता कर्णधार असलेल्या सूर्यकुमार यादवने आपलं मत व्यक्त केलं आहे.

आयपीएल 2026 स्पर्धेची सुरूवात मुंबई इंडियन्सने विजयाने केली होती. पहिल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाचा पराभव केला होता. मात्र दुसऱ्या सामन्यात विजयाची गाडी रूळावरून उतरली. दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सला दुसऱ्या सामन्यात सहज पराभूत केलं. या सामन्यात नाणेफेकीचा कौल गमवल्याने मुंबई इंडियन्सला प्रथम फलंदाजी करावी लागली. मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 गडी गमवून 162 धावा केल्या आणि विजयासाठी 163 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान दिल्ली कॅपिटल्सने 18.1 षटकात 4 गडी गमवून पूर्ण केलं. या सामन्याच्या निकालानंतर मुंबई इंडियन्सला गुणतालिकेत फटका बसला आहे. दिल्ली कॅपिटल्सचा संघ 4 गुण आणि +1.170 नेट रनरेटसह पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. तर मुंबईचा संघ 2 गुण आणि -0.206 नेट रनरेटसह सहाव्या स्थानावर घसरला आहे. या सामन्यातील पराभवानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव याने विश्लेषण केलं आहे.
काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
दिल्लीकडून मिळालेल्या पराभवानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव म्हणाला की, ‘मला वाटतं खेळपट्टी बऱ्यापैकी चांगली होती. ती थोडी संथ असेल अशी आमची अपेक्षा होती. पण तरीही फलंदाजीच्या दृष्टीने आम्ही 15.20 धावांनी कमी पडलो. पण मला गोलंदाजांचे श्रेय कमी करायचे नाही आणि त्यांच्या फलंदाजांनीही दुसऱ्या डावात खूप चांगली फलंदाजी केली. रिझवीबद्दल सांगायचं तर 7 धावांवर 2 गडी बाद असताना अशाप्रकारे येऊन केली. त्याचे बरेचसे श्रेय त्याला जाते. त्याने आम्हाला सामन्यात परत कधीच येऊ दिले नाही. गोलंदाजी विभागात ज्या गोष्टी होत्या, त्या सर्व गोष्टींचे पालन करण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न केला, पण आम्ही पुनरागमन करू शकलो नाही.’
खेळपट्टीबाबत सूर्यकुमार यादव म्हणाला की, ‘मला वाटतं ती बऱ्यापैकी तशीच होती. त्यात फारसा बदल झाला नाही, पण ज्याप्रकारे ते फलंदाजी करत होते, मला वाटतं ते खूप सुंदर खेळले. त्यांनी दुसऱ्या डावात परिस्थिती खूप चांगल्या प्रकारे समजून घेतली आणि सुंदर फलंदाजी केली. त्यामुळे एक चांगली धावसंख्या गाठता आली असती. जेव्हा तुम्ही पहिल्यांदा फलंदाजी करत असता, तेव्हा धावसंख्येचा विचार करण्यासारखं दुसरं काही नसतं. तुम्ही फक्त फलंदाजी करत राहता, आकडेवारी समजून घेता, काय चांगलं आहे, इथे काय चांगलं झालं आहे हे पाहता, पण आम्हाला वाटलं की 180-185 ही एक चांगली धावसंख्या असती. आम्ही पुन्हा नव्याने सुरुवात करू, कठोर परिश्रम करू आणि पुढच्या काही दिवसांत पुनरागमन करू.’