
IND vs PAK, T20 World Cup 2026: टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील हायव्होल्टेज सामना् भारत पाकिस्तान यांच्यात होत आहे. या सामन्यात कोण बाजी मारणार? याची उत्सुकता आतापासूनच लागून आहे. तसं पाहिलं तर टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारताचं पारडं जड आहे. पण खेळ म्हटलं तर काहीही होऊ शकतं. त्यामुळे प्रत्येक गोष्ट व्यवस्थितरित्या करणं गरजेचं आहे. कारण एक चूक आणि पराभव हे निश्चित आहे. त्यामुळे ताकही फुंकून पिण्याची गरज आहे. भारत आणि पाकिस्तान या दोघांनी या स्पर्धेतील सुरूवातीचे दोन सामने जिंकले आहेत. आता तिसरा सामना जिंकून सुपर 8 फेरीतील स्थान पक्कं करण्याचं दोन्ही संघांचा मानस आहे. असं असताना टीम इंडियाची कमकुवत बाजू या स्पर्धेतील दोन सामन्यात उघड झाली आहे. त्याचा फायदा पाकिस्तान घेऊ शकतो. खासकरून दुबळ्या नामिबियाविरुद्धच्या सामन्यात हे गोष्टी तीव्रतेने दिसून आली. चला जाणून घेऊयात टीम इंडियाच्या 4 कमकुवत बाबी
अभिषेक शर्माने टी20 वर्ल्डकप स्पर्धा सुरू झाल्यानंतर चाहत्यांना नाराज केलं आहे. पहिल्या सामन्यात शून्यावर बाद झाला. त्यानंतर तब्येत बिघडल्याने रुग्णालयात दाखल केलं गेलं. त्यामुळे दुसर्या सामन्यात खेळला नाही आणि पाकिस्तानविरूद्ध खेळेल की नाही ते माहिती नाही. कर्णधार सूर्यकुमार यादवने पुढच्या एक दोन सामन्यात खेळणार नसल्याचं आधीच स्पष्ट केलं आहे. त्यामुळे पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात खेळला नाही तर टीम इंडियाचं टेन्शन वाढेल.
रिंकु सिंहचा फॉर्म सध्या चिंतेचा विषय ठरला आहे. स्पर्धेपूर्वी त्याचा फॉर्म होता. मात्र अचानक त्याला नजर लागल्यासारखं वाटत आहे. पहिल्या दोन सामन्यात काही खास करू शकला नाही. पहिल्या सामन्यात 14 चेंडूंचा सामना केला आणि 6 धावा करून बाद झाला. यात त्याने एकही चौकार किंवा षटकार मारला नाही. तर दुसऱ्या सामन्यात 6 चेंडूत फक्त 1 धाव करून बाद झाला. त्यामुळे त्याच्या फलंदाजीला ग्रहण लागल्याची भीती वाटत आहे.
भारतीय संघ गेल्या काही महिन्यात फिरकीचा सामना करताना अडचणीत आल्याचं दिसून आलं आहे. नामिबियाविरुद्धच्या सामन्यात हे गडदपणे अधोरेखित झालं. नामिबियाचे फिरकीपटू बर्नार्ड शोल्ट्ज आणि गेरहार्ड इरास्मस यांच्या फिरकीच्या जाळ्यात भारतीय फलंदाज अडकले. पाकिस्तानकडे फिरकीची मजबूत फळी आहे. त्यांचा सामना करताना भारतीय फलंदाज अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे भारतीय फलंदाजांना अधिक काळजी घ्यावी लागणार आहे.
पावरप्लेच्या सहा षटकात भारतीय गोलंदाजांनी निराशा केली आहे. नामिबियाने या सहा षटकात भारतीय गोलंदाजांना जेरीस आणलं. नामिबियाने 6 षटकात 1 गडी गमवून 57 धावा केल्या. त्यावरून भारतीय गोलंदाजी कमकुवत असल्याचं दिसून येतं. पाकिस्तानविरुद्ध पावरप्ले निर्णायक ठरू शकतो. त्यामुळे गोलंदाजांना अजून चांगलं काम करावं लागणार आहे.